सहा विजय वनराई बंधाऱ्यांची उभारणी; पाले ग्रामपंचायत; ग्रामस्थांचा उत्स्फूर्त सहभाग

 अधिकाऱ्यांचे मार्गदर्शन

मंडणगड (प्रतिनिधी) : मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान अंतर्गत पाले ग्रामपंचायतीत विजय, वनराई बंधारे उपक्रम मोठ्या उत्साहात राबविण्यात आला. पाले गावठाण, कोंडवाडी आणि बौद्धवाडी येथील ग्रामस्थ, महिला वर्ग तसेच ग्रामस्तरीय कर्मचारी मोठ्या संख्येने सहभागी होत सहा बंधाऱ्यांची उभारणी केली. या उपक्रमास पंचायत समिती विस्तार अधिकारी मुरलीधर कुरई, पवन गोसावी, समीर वारे, ग्रामपंचायत अधिकारी मेघन चिले यांनी भेट देत उपस्थितांना मार्गदर्शन केले. त्यांच्या उपस्थितीमुळे कार्यकर्ते व ग्रामस्थ यांना मोठा उत्साह मिळाला.
ग्रामपंचायत कार्यक्षेत्रात वाहत्या ओढ्यावर सहा विजय बंधाऱ्यांचे बांधकाम करण्यात आले असून, या बंधाऱ्यांमुळे त्या त्या परिसरातील जलसंधारण मजबूत होऊन पशुपक्ष्यांना देखील त्याचा फायदा होणार आहे. परिसरातील विहिरींच्या पाणीसाठ्यात देखील सुधारणा होणार आहे. ग्रामस्थांच्या स्वयंश्रमातून आणि प्रशासनाच्या सहकार्याने हा उपक्रम यशस्वी झाला. या अभियानात माजी सरपंच संध्या वणे, निलेश रक्ते, जयेंद्र दुसार, जयवंत जाधव, नामदेव दुर्गवले, शांताराम वणे, सुरेश वणे, सदाशिव जाधव, विजय मोकल, सुधाकर माळी, दिलीप माळी, नथुराम वने, पांडुरंग टक्के यांच्यासह अनेक ग्रामस्थ, महिलांनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेत परिश्रम केले. पाणी अडवा पाणी जिरवा या तत्त्वावर आधारित हा उद्देशपूर्ण उपक्रम अधिक सक्षमपणे तालुक्यात राबविल्यास भविष्यातील जलसंकट टाळण्यास हातभार लावणार आहे.