जिल्हा सचिव, तालुकाप्रमुख निवडणूक रिंगणात
विरार : वसई-विरार महापालिकेच्या निवडणुकीत भारतीय जनता पक्षासोबत युती करून शिवसेना २७ जागांवर निवडणूक लढवीत आहे. शिवसेनेला मिळालेल्या २७ जागांपैकी त्यांनी १५ ठिकाणी उमेदवार म्हणून महिलांना संधी दिली आहे. शिवसेनेचे वसई-विरार महासचिव अतुल पाटील आणि वसई तालुका प्रमुख सुदेश चौधरी हे देखील निवडणूक रिंगणात उतरले आहेत.
पालघर जिल्ह्यात नुकताच पार पडलेल्या तीन नगर परिषद आणि एका नगरपंचायतीच्या निवडणुकीत भाजप आणि शिवसेनेने युती न करता स्वतंत्र निवडणूक लढविली आहे. चार पैकी दोन ठिकाणी भाजप आणि दोन ठिकाणी शिवसेनेचा नगराध्यक्ष झाला आहे. वसई-विरार महापालिका निवडणुकीसाठी मात्र सुरुवातीपासूनच महायुती म्हणून लढण्याची संकेत दोन्ही राजकीय पक्षांच्या नेत्यांनी दिले होते. भाजपचे निवडणूक प्रमुख आमदार राजन नाईक आणि शिवसेनेचे पालघर जिल्हा संपर्कप्रमुख माजी आमदार रवींद्र फाटक यांनी महायुतीबाबत सुरू केलेल्या चर्चांना वरिष्ठ नेत्यांसोबत झालेल्या बैठकीत पूर्णविराम मिळाला. या निवडणुकीत भाजप ८८, तर शिवसेना २७ जागांवर महायुती म्हणून निवडणूक लढवीत आहे. श्रमजीवी संघटना आणि आगरी सेना सुद्धा या माहितीमध्ये समाविष्ट आहे. दरम्यान, शिवसेनेकडे असलेल्या २७ जागांपैकी १५ जागांवर शिवसेनेने उमेदवार म्हणून महिलांना संधी दिली आहे.
त्याचप्रमाणे शिवसेनेच्या संघटनेतील पदाधिकाऱ्यांना किंवा त्यांच्या कुटुंबातील सदस्यांनाही निवडणूक रिंगणात उतरविण्यात आले आहे. जिल्हा सचिव अतुल पाटील आणि तालुकाप्रमुख सुदेश चौधरी हे स्वतः निवडणूक रिंगणात आहेत, तर उपजिल्हाप्रमुख जितेंद्र शिंदे यांच्या अर्धांगिनी स्नेहल शिंदे आणि विभाग प्रमुख अमोल म्हात्रे हे देखील या निवडणुकीत आपले नशीब आजमावत आहेत. तसेच स्वप्निल बांदेकर, अपर्णा पाटील, सप्तमी डांबरे, हरेश्वर पाटील, कल्याणी पाटील, चंद्रकांत वझे, वैशाली सोनवणे, अश्विनी भोईर, सीमा करवाला, शुभांगी सुर्वे, पुतल झा, संजय महतो, दिपाली नारकर, अपर्णा खांबे भाविका टेलॉर, हेमलता भगत, हेमलता सिंह, अभिषेक सिंह, उज्वला किनी, शिल्पा सिंह, उमेश माळी, यशोधन ठाकूर आणि जेनी अँड्रॉ ड्रेस हे महायुतीचे उमेदवार म्हणून निवडणूक लढवीत आहेत.











