राकेश कोळी
खेड (प्रतिनिधी) – “2009 पासून विभागलेला खेड मतदारसंघ पुन्हा निर्माण होणार आहे,” असे शिवसेना नेते रामदास कदम यांनी जाहीरपणे सांगताच संपूर्ण खेड तालुक्यात उत्साहाचे आणि आनंदाचे वातावरण पसरले आहे. अनेक वर्षांपासून पुनर्रचनेची मागणी करणाऱ्या नागरिकांसाठी हा आनंदाचा क्षण ठरला आहे. शुक्रवार, दिनांक ९ जानेवारी रोजी खेड येथील हॉटेल बिसू येथे झालेल्या भव्य पक्ष प्रवेश सोहळ्यात कदमांनी हा महत्त्वपूर्ण राजकीय संकेत दिला. या सोहळ्यात तालुक्यातील विविध गावांमधील इतर पक्षातील शेकडो कार्यकर्त्यांनी शिवसेनेत जाहीर प्रवेश केला. या प्रवेशामुळे शिवसेनेची संघटनात्मक ताकद अधिकाधिक भक्कम होताना दिसली. सभागृहात उपस्थित असलेल्या तालुकाप्रमुख अरुण चव्हाण, सचिन धाडवे, शहरप्रमुख कुंदन सातपुते, विविध शाखांचे पदाधिकारी आणि मोठ्या संख्येने जमलेल्या शिवसैनिकांनी प्रवेशकर्त्यांचे उत्साहात स्वागत केले.
नव्या सदस्यांना मार्गदर्शन करताना शिवसेना नेते रामदास कदम यांनी त्यांचा विश्वास दृढ करण्यासोबतच विकासाचे ठोस आश्वासनही दिले. “तुम्ही दाखवलेला विश्वास केवळ शब्दांत मर्यादित राहणार नाही. खेड तालुक्यातील प्रत्येक गावात विकासाचा वेग वाढवू. रोजगार, रस्ते, पाणीपुरवठा, आरोग्य आणि शिक्षण यासाठी सातत्याने प्रयत्न करणार,” असे ते म्हणाले. कदमांनी खेड नगरपालिकेतील ऐतिहासिक 21-0 विजयाचा उल्लेख करत शिवसैनिकांचे मनोबल वाढवले. “खेडवासियांनी यापूर्वीच दाखवून दिले की त्यांचा विश्वास शिवसेनेवर आहे. आता जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांमध्येही भगवा एकहाती फडकवण्याची वेळ आली आहे,” असे त्यांनी जोर देऊन सांगितले.
या भाषणातील सर्वात ठळक आणि लक्षवेधी मुद्दा म्हणजे खेड मतदारसंघाच्या पुनर्रचनेबाबत केलेला उल्लेख. कदम म्हणाले, “2009 पासून विभागलेला खेड मतदारसंघ पुन्हा तयार होणार आहे. आणि त्या मतदारसंघातून पुढील आमदार हा शिवसेना नेते रामदास कदम देतील तोच असेल, याची मला शंभर टक्के खात्री असल्याचा विश्वास देखील त्यांनी व्यक्त केला. त्यांच्या या विधानानंतर सभागृहात टाळ्यांचा आणि घोषणाबाजीचा गजर झाला. अनेक वर्षांपासून विभागलेला मतदार संघ पुन्हा होणार असल्याचे सांगतच सभागृहात नव चैतन्य संचारल्याचे दिसून आले.
यावेळी कदमांनी गुहागर मतदारसंघाचा मुद्दाही अधोरेखित केला. दापोली विधानसभा मतदारसंघात आमदार योगेश कदमांनी गेल्या काही वर्षात साडेतीन हजार कोटींची विकास कामे केल्याचे सांगत असताना त्यांनी स्पष्ट केले की विकासापासून मागे राहिलेल्या गुहागर विधानसभा मतदारसंघाच्या विकासासाठी ते स्वतः प्रयत्नशील राहणार आहेत. त्यामुळे आता दापोली पाठोपाठ गुहागर विधानसभा मतदारसंघाचा सर्वांगीण विकास होणार असल्याचे देखील त्यांनी जाहीर केले.
कोकणातील तरुणांसाठी त्यांनी उद्योग क्षेत्रात मोठी घोषणा केली. “कोकणातील अनेक युवक रोजगाराच्या शोधात बाहेर गेले आहेत. मला ते कोकणातच स्थिर व्हावेत असे वाटते. कोका-कोला कंपनीचे आणखी चार प्लांट कोकणात सुरू होणार आहेत. यामुळे मोठ्या प्रमाणावर रोजगार निर्मिती होईल,” असे त्यांनी स्पष्ट केले. त्यांच्या या घोषणेने तरुणांमध्ये नवी आशा निर्माण केली असून उद्योग क्षेत्रात कोकणाला चालना मिळणार असल्याचे जाणवले.
शेकडो कार्यकर्ते शिवसेनेत दाखल झाल्याने आणि कदमांनी केलेल्या महत्त्वपूर्ण घोषणांमुळे तालुक्यात उत्साहाची लहर पसरली आहे. गावोगावी या बदलांची चर्चा सुरू झाली असून आगामी काळात खेड आणि गुहागर या दोन्ही मतदारसंघातील राजकीय घडामोडींना अधिक वेग येण्याची चिन्हे दिसत आहेत. शिवसेनेची वाढती ताकद, प्रशासनावर पकड आणि विकासाचे आश्वासन यामुळे तालुक्यातील राजकीय समीकरणे नव्याने रचली जात असल्याचे स्पष्टपणे जाणवत आहे.












