देवगड | प्रतिनिधी :
देवगडसाठी लवकरच सुसज्ज नाट्यगृह उभारणार
देवगडमधील तरुणांनी उभारलेला नाट्य महोत्सव हा केवळ स्थानिक पातळीपुरता मर्यादित न राहता, पुणे-मुंबईप्रमाणे दर्जेदार सांस्कृतिक व्यासपीठ निर्माण करण्याची क्षमता बाळगतो, असे प्रतिपादन सिंधुदुर्गचे पालकमंत्री तथा राज्याचे मत्स्य व्यवसाय व बंदरे विकास मंत्री नितेश राणे यांनी केले. ‘युथ फोरम’च्या माध्यमातून तरुणांनी दाखवलेली नियोजनबद्धता, परिश्रम आणि सांस्कृतिक बांधिलकी यामुळे देवगडची ओळख राज्यपातळीवर अधिक भक्कम होत असल्याचे त्यांनी नमूद केले.
यावेळी त्यांनी १ मे, महाराष्ट्र दिनाच्या पार्श्वभूमीवर देवगडमध्ये सुसज्ज नाट्यगृहाच्या भूमिपूजनाची घोषणा केली. “पुढील वर्षीचा नाट्य महोत्सव आपल्या हक्काच्या नाट्यगृहातच होईल,” असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
युथ फोरम या स्वयंसेवी संस्थेतर्फे आयोजित ‘नाट्य गौरव 2026’ पुरस्कार सोहळा आणि नाट्य महोत्सवाच्या दुसऱ्या दिवशी विविध मान्यवरांचा सत्कार करण्यात आला. ज्येष्ठ नाट्यकर्मी व दिग्दर्शक राजेंद्र चव्हाण यांना यंदाचा ‘नाट्य गौरव 2026’ पुरस्कार प्रदान करण्यात आला. या कार्यक्रमास नितेश राणे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.
देवगडमध्ये कोणत्याही सुविधा अपुऱ्या राहू नयेत, यासाठी शासन कटिबद्ध असून मुंबईप्रमाणेच सुविधा देवगडकरांना उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने विकासकामे सुरू असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
कलाकारांना व्यासपीठ देणारा उपक्रम
या महोत्सवाच्या माध्यमातून नवोदित कलाकारांना संधी उपलब्ध होत असून देवगडच्या सांस्कृतिक जडणघडणीत या उपक्रमाचा मोठा वाटा असल्याचे राणे यांनी सांगितले. “तरुणांनी एकत्र येऊन उभा केलेला हा उपक्रम भविष्यात देवगडला राज्य व राष्ट्रीय पातळीवर ओळख मिळवून देईल,” असेही ते म्हणाले.
दरम्यान, व्यावसायिक नाट्य क्षेत्रात देवगडमध्ये पूर्वी काम पाहणारे व्यवस्थापक भाऊ सहस्रबुद्धे व दत्ता पारकर यांचा मानपत्र देऊन गौरव करण्यात आला.
“कोकण पर्यटनाची राजधानी बनू शकते” – कृष्णराज महाडिक
भाजप युवा मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष कृष्णराज महाडिक यांनी आपल्या भाषणात कोकणातील पर्यटन क्षमतेवर प्रकाश टाकला. “कोकण प्रदेश भविष्यात पर्यटनाची राजधानी बनण्याची क्षमता ठेवतो. मी यापूर्वी येथे आलो नव्हतो; मात्र यापुढे नियमित भेट देईन,” असे त्यांनी सांगितले. तसेच युवक संघटनांची भूमिका विकासात महत्त्वाची असल्याचेही त्यांनी अधोरेखित केले.
कार्यक्रमाला माजी आमदार अजित गोगटे, सभापती गणेश राणे, संदीप साटम, बाळ ख. डपे, संस्थेचे अध्यक्ष सिद्धेश माणगावकर, प्रकाश बोडस, दयानंद पाटील, राजा भुजबळ, योगेश पाटकर, बंड्या नारकर, भूषण पोकळे आदींसह अनेक मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ऋत्विक धुरी यांनी केले. मानपत्र लेखन मनोज सहस्रबुद्धे यांनी केले, तर त्याचे वाचन प्रमोद नलावडे यांनी केले.










