कणकवलीतील हिंदू मुस्लिम बांधवांची एकता उल्लेखनीय: समीर नलावडे
कणकवली प्रतिनिधी : ईद ए मिलाद निमित्त कणकवली पटवर्धन चौकात माजी नगराध्यक्ष समीर नलावडे, राष्ट्रवादी काँग्रेस जिल्हाध्यक्ष माजी नगरसेवक अबिद नाईक यांच्या प्रमुख उपस्थितीत सर्वांना सरबत वाटप करण्यात आले.
यावेळी भाजपा युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष संदीप मेस्त्री ,शिशिर परूळेकर, अजीम कुडाळकर, आसिफ नाईक, ऍड अष्पाक शेख, निसार काझी, इम्रान शेख, सलाउद्दीन कुडाळकर, बडेमिया शेख , इबु शेख, मूदस्सर मुकादम, झाकीर हुदली, जावेद शेख, तौसिफ बागवान, बाबूल पटेल, सादिक कुडाळकर, अब्दुल नाईक, सलमान शेख आदी उपस्थित होते.
यावेळी बोलताना माजी नगराध्यक्ष समीर नलावडे म्हणाले की मोहंमद पैगंबर हे सर्व समाजात शांतता प्रस्थापित व्हावी हा उपदेश करत असत. मोहम्मद पैगंबर हे शांततेचे प्रतीक होते. देशात किंवा राज्यातील कुठल्याही भागात जरी हिंदू मुस्लिम धर्मीयांमध्ये तेढ निर्माण झाल्याचा अनुचित प्रसंग घडला तरीही कणकवली शहर आणि तालुक्यात मात्र हिंदू मुस्लिम बांधव हे गुण्यागोविंदाने नांदत असतात. सिंधुदुर्ग जिल्ह्यासह कणकवली तालुक्यातील मुस्लिम बांधवांनी अनंत चतुर्दशी दिवशी ईद सण असतानाही धार्मिक सलोखा राखावा आणि कायदा व सुव्यस्थेवर ताण येऊ नये यासाठी सामंजस्याने अनंत चतुर्दशी दिवशी ईद साजरी न करता आज 29 सप्टेंबर रोजी जल्लोषात ईद साजरी करण्याचा निर्णय घेतला.एममेकांच्या सणांचे महत्व अबाधित राखून एकोप्याने एकमेकांच्या सणासुदीत सहभागी होण्याची परंपरा कणकवली शहर आणि तालुक्यातील हिंदू मुस्लिम बांधवांनी जोपासली आहे. अबिद नाईक आणि माझ्यात भावाप्रमाणे नाते आहे.म्हणूनच आज मुस्लिम बांधवांच्या उत्सवात सहभागी होत मी ईद च्या शुभेच्छा देत आहे. आसिफ नाईक यांनी सांगितले की मुस्लिम धर्माचे प्रेषित मोहंमद पैगंबर यांचा जन्मदिवस हा ईद ए मिलाद म्हणून साजरा केला जातो. कणकवली शहरासह तालुक्यात ईद सणात सर्वच हिंदू बांधव सुद्धा सामील असतात. या आनंदाच्या दिवशी आज कणकवली तालुका मुस्लिम समाज कमिटी च्या वतीने मोफत सरबत वाटप करण्यात आले आहे.कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी निसार शेख ,शानू शहा, अस्लम निशानदार, सरफराज शेख, सलाम पटेल,आसिफ पटेल, अस्लम धारवाडकर ,अब्दुल उडियांन यांनी मेहनत घेतली.











