रिगल कॉलेजच्या विद्यार्थ्यांचे गुहागर किनारी ‘स्वच्छता अभियान’

गुहागर l प्रतिनिधी :निरनिराळ्या उपक्रमांमध्ये सक्रिय सहभागी असणाऱ्या रिगल कॉलेज ऑफ हॉटेल मॅनेजमेंट शृंगारतळीच्या विद्यार्थ्यांनी जागतिक पर्यटन दिनाचे औचित्य साधत गुहागर समुद्रकिनारी स्वच्छता अभियान राबविले व सामाजिक बांधिलकी जपत स्वच्छतेचा संदेश दिला.

२७ सप्टेंबर हा दिवस जागतिक पर्यटन दिवस म्हणून साजरा केला जातो. याचे औचित्य साधून रिगल कॉलेज दरवर्षी एक वेगळा उपक्रम राबवित असते. गुहागर हे पर्यटनस्थळ असल्यामुळे येथील समुद्रकिनारा नेहमीच पर्यटकांनी गजबजलेला असतो. यासाठी यावर्षी येथील समुद्रकिनारा स्वच्छ करण्यासाठी रिगल कॉलेज ऑफ हॉटेल मॅनेजमेंट शृंगारतळीच्या डिग्री व डिप्लोमाच्या विद्यार्थ्यांनी समुद्रकिनाऱ्यावर स्वच्छता अभियान राबविले. विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक विकासाबरोबरच त्यांना सामाजिक बांधिलकीचे भान असावे यादृष्टीने रिगल कॉलेज नेहमीच असे उपक्रम राबवित असते.

याप्रसंगी प्रा. शैलेश घाणेकर, प्रा. वृणाल बेर्डे, प्रा. अल्तफा तवसाळकर तसेच हॉटेल मॅनेजमेंट विभागाचे सर्व विद्यार्थी उपस्थित होते. रिगल एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष श्री. संजय शिर्के, संचालिका डॉ. सुमिता शिर्के, प्राचार्य सौ. रेश्मा मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली स्वच्छता अभियान राबविण्यात आले.