महाराजांचे लोकोद्धारासाठी महनीय कार्य! उद्योजक डॉ दीपक परब यांचे प्रतिपादन
मसुरे | झुंजार पेडणेकर : राष्ट्रसंत पाचलेगावकर महाराज प्रणित राष्ट्रधर्म प्रचारक मिशन श्री चिन्मय पादुका महोत्सवाचे सुवर्ण महोत्सवी वर्षांचा सांगता समारंभ मान्यवरांच्या उपस्थितीत मुलुंड येथील मुक्तेश्वर आश्रमात जल्लोषात संपन्न झाला. या सोहळ्यामध्ये अनुष्ठान, भजन, कीर्तन, आध्यात्मिक प्रवचने, रक्तदान शिबिर आदि कार्यक्रमांचे आयोजन दैनिक सामुदायिक उपसानेबरोबर केले गेले.
समारंभाच्या अध्यक्षस्थानी कोकण अग्रो एक्सपोर्टचे संचालक डॉ. दीपक परब होते तर व्यासपीठावर सद्गुरू दत्तानंद स्वामी, स्थानिक नगरसेवक प्रकाश गंगाधरे, चिन्मय पादुका ट्रस्टचे अध्यक्ष विठ्ठल परब, मानवता विकास परिषद अध्यक्ष श्रीकांत सावंत आदि मान्यवर उपस्थित होते.
रुद्राभिषेक, महाप्रसादानंतर श्री दत्तात्रेयांच्या पालखीची व महाराजांच्या प्रतिमेची भव्य मिरवणूक काढण्यात आली. देश, विदेशातून महाराजांचे असंख्य शिष्यगण यात सामील झाले होते. गेली पन्नास वर्षे अखंडितपणे सुरू असलेल्या या महोत्सवात पालखी खाली झोपण्याची तसेच पालखी खालून प्रदक्षिणा घालण्याची प्रथा आहे व असे केल्याने आपल्या व्याधी, अडचणी दूर होतात असा भाविकांचा दृढ विश्वास आहे. ‘आधी केले मग सांगितले’ या उक्तीप्रमाणे महाराजांनी श्रमतपस्या, दुष्काळग्रस्तांना मदत, अनाथ बालकाश्रम, महीलाश्रम आदि उपक्रम राबवून लोकोद्धारासाठी महनीय कार्य केले. आजही त्यांनी केलेल्या लोकोपयोगी, परोपकारी कार्याचा ठळकपणे उल्लेख होतो हीच त्यांच्या कार्याची महती आहे. देशभर विविध ठिकाणी महाराजांनी स्थापन केलेल्या मुक्तेश्वर आश्रमांत नित्यनेमाने सामुदायिक उपासना शिष्यगण करतात असे यावेळी मान्यवरांनी सांगितले. ट्रस्टचे अध्यक्ष विठ्ठल परब, कार्यवाह जयप्रकाश ठाकूर, विश्वस्त गुरुनाथ दळवी, अवधूत सारंग, चंद्रशेखर दाभोलकर याप्रसंगी उपस्थित होते.












