श्रीमान भागोजीशेठ कीर विधी महाविद्यालय, अधिवक्ता परिषद (कोकण प्रांत) जिल्हा रत्नागिरी, जिल्हा विधी सेवा प्राधिकरण यांच्या संयुक्त विद्यमाने संविधान दिन
रत्नागिरी : संविधान पूर्ण देशात लागू असून जिल्हा स्तरावर काम करताना संविधान अत्यंत महत्त्वाचे आहे. भारतीयांचे व देशाचे सर्वतोपरी हित जोपासणे हे संविधानाचे मूळ उद्दिष्ट, ध्येय आहे. २०१५ पासून संविधान दिन देशात साजरा होत आहे. सध्याची स्थिती पाहता प्रत्येक घरात संविधानाचे वाचन, अभ्यास महत्त्वाचे राहणार आहे. विधी पदवीचे विद्यार्थी म्हणून चांगल्या प्रकारे संविधानाचा अभ्यास करावा, त्यांनी समाजापर्यंत संविधान पोहोचवावे, असे आवाहन जिल्हा मुख्य न्यायदंडाधिकारी राहुल चौत्रे यांनी केले.
श्रीमान भागोजीशेठ कीर विधी महाविद्यालय, अधिवक्ता परिषद (कोकण प्रांत) जिल्हा रत्नागिरी, जिल्हा विधी सेवा प्राधिकरण यांच्या संयुक्त विद्यमाने गोगटे-जोगळेकर महाविद्यालयाच्या राधाबाई शेट्ये सभागृहात आयोजित संविधान कार्यक्रमात ते बोलत होते. याप्रसंगी वरिष्ठ न्यायाधीश तथा जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव निखिल गोसावी, अधिवक्ता परिषदेचे रत्नागिरी जिल्हाध्यक्ष अॅड. भाऊ शेट्ये, दि यश फाउंडेशनचे व्यवस्थापकीय विश्वस्त बाळासाहेब माने, भागोजीशेठ कीर विधी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अॅड. आशिष बर्वे, र. ए. सोसायटीच्या कार्याध्यक्ष शिल्पाताई पटवर्धन व्यासपीठावर उपस्थित होते.
दिवाणी न्यायाधीश तथा जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव निखिल गोसावी यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले. ते म्हणाले की, संविधान अमलात आणले तर हे प्रश्न उपस्थित न राहता देशाची अखंडता टिकून राहील. विद्यार्थ्यांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे शिक्षणाबद्दलचे विचार माहिती असणे गरजेचे आहे. आपल्या सभोवती घडणाऱ्या घटनांचा अभ्यास संविधान समोर ठेवून करावा, संविधानातील तरतुदींची अंमलबजावणी केली पाहिजे.
या वेळी जिल्हा मुख्य न्यायदंडाधिकारी श्री. चौत्रे म्हणाले की, भारतीय संविधान चांगले होण्यासाठी संविधान समितीने अभ्यास केला. इतर देशांच्या संविधानांचाही अभ्यास केला. संविधान इंग्रजी हस्ताक्षरात लिहिले असून त्यासाठी १ लाख १७ हजार ३६९ शब्द लिहिले. विद्यार्थ्यांनी ही गोष्ट लक्षात घ्यावी की लेखनाची सवय आवश्यक आहे. ज्यामुळे मेंदूतही ही गोष्ट पक्की बसते. त्यामुळे नोट्स काढण्याची सवय विद्यार्थ्यांनी अंगिकारावी. मूळ संविधानात समाजवादी आणि धर्मनिरपेक्ष या दोन शब्दांचा समावेश नव्हता. ४२ व्या घटना दुरुस्तीनंतर हे दोन शब्द समाविष्ट करण्यात आले. विधी महाविद्यालयाचे विद्यार्थी लोकन्यायालय, कायदेशीर शिबिरांमध्ये स्वयंसेवक म्हणून उत्कृष्ट काम करत आहेत. त्यासाठी महाविद्यालयाचे विशेष कौतुक. सत्यमेव जयते याच परिभाषेवर संविधानाचे कार्य चालते.
याप्रसंगी अॅड. डॉ. आशिष बर्वे यांनी संविधानाची निर्मिती, वैशिष्ट्ये सांगितली. ते म्हणाले की, आपल्या संविधानात आपली सांस्कृतिक मूल्ये दिसतात. अत्यंत खुबीने आपल्या सामर्थ्यसंपन्न इतिहासीच आठवण आणि त्याच बरोबरीने भविष्यात कशा प्रकारे सामाजिक वाटचाल अपेक्षित आहे, त्याची दिशा संविधानातील विविध चित्रांमधून दिसून येते. कोणी काय व कसे काम करावे याचे मार्गदर्शन संविधानानेच शासनाला केले आहे. कायदेमंडळ कायदा करण्याचे काम करते, कार्यकारी मंडळ कायदे राबवण्याचे काम करते, न्यायपालिका न्याय प्रशासन हे कायद्यांचा अन्वयार्थ लावणे हे काम करते, भारतीयांचे व देशाचे हित जपणे हे संविधानाचे उद्दिष्ट आहे.
माजी आमदार बाळासाहेब माने यांनी संविधान सर्वोच्च असल्यानेच २०१५ पासून भाजप सरकारने संविधान दिन साजरा करण्यास सुरवात केली आहे. हर घर तिरंगा या अभियानाप्रमाणे हर घर संविधान ही मोहीम सुरू केली पाहिजे, असे आवाहन केले. त्याकरिता वकिल, वकिलीचे विद्यार्थी यांची महत्त्वाची जबाबदारी असल्याचे सांगितले. श्री. माने यांनी विद्यमाने सामाजिक परिस्थितीवर भाष्य करत लोकशाही टिकवण्यासाठी जागृत मतदारांनी आपली जबाबदारी ओळखावी. तसेच लोकशाही बळकट होण्यासाठी लोकप्रतिनिधींची जबाबदारी यावर प्रकाश टाकला.
याप्रसंगी अॅड. रत्नदीप चाचले यांनी अधिवक्ता परिषदेची गरज, स्थापना, कार्य, जिल्हा शाखेच्या कामाचा थोडक्यात आढावा घेतला. मान्यवरांचा सत्कार अॅड. भाऊ शेट्ये यांनी केला. अॅड. रोहित देव यांनी सूत्रसंचालन केले. सौ. श्रुती काटे यांनी संपूर्ण वंदे मातरम् सादर केले.
संविधान प्रतिबिंब भारतीय संस्कृतीचे पुस्तिका प्रकाशन
संविधान दिनाचे औचित्य साधून अधिवक्ता परिषदेच्या माध्यमातून संविधान प्रतिबिंब भारतीय संस्कृतीचे पुस्तिकेचे प्रकाशन जिल्हा मुख्य न्यायदंडाधिकारी श्री. चौत्रे यांच्या हस्ते करण्यात आले. या पुस्तिकेतून संविधानाच्या निर्माणाच्या काळापासून ते आत्ता असलेल्या संविधानात कशा प्रकारे आपली भारतीय मुल्ये, आदर्श आणि संस्कृती प्रतिबिंबीत होते, हे आक भारतीय नागरिक म्हणून वेगळ्या नजरेतून अभिमानाने दाखवण्याचा एक वेगळा प्रयत्न आहे. भारतीय संविधान घरोघरी पोहोचवण्यासाठी प्रयत्न म्हणून अॅड. भाऊ शेट्ये यांच्या संकल्पनेतून ही पुस्तिका बनवली आहे. त्यासाठी अॅड. डॉ. आशिष बर्वे, अॅड. गौरी शेवडे-देसाई यांनी योगदान दिले आहे. संविधान धर्माधिष्ठीत, कलात्मक, सनातन संस्कृतीवर आधारित आहे. याचे सर्वत्र वितरण करण्यात येणार आहे.
उल्लेखनीय यशाबद्दल सत्कार
मुख्य लोक अभिरक्षक अॅड. अजित वायकुळ, जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोग (सिंधुदुर्गनगरी) अॅड. योगेश खाडिलकर, रत्नागिरी जिल्हा सरकारी वकील अॅड. अनिरुद्ध फणसेकर, एस. बी. कीर लॉ कॉलेजचे प्र. प्राचार्य अॅड. डॉ. आशिष बर्वे, महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण येथे सदस्य म्हणून नियुक्तीबद्दल अॅड. प्रिया लोवलेकर, रत्नागिरी जिल्हा बाल कल्याण समितीवर अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल अॅड. संदेश शहाणे यांचा सत्कार केला. अधिवक्ता परिषद रत्नागिरी तालुका कार्यकारिणी नूतन मंत्री अॅड. अवधूत कळंबटे, सहमंत्री अॅड. रोहित देव आणि सदस्य अॅड. स्वप्नील शिंदे, अॅड. राहुल कदम, अॅड. जान्हवी पवार, अॅड. ज्ञानेश पोतकर यांचेही स्वागत करण्यात आले.












