सिंधूनगरीत साकारतंय अद्यावत कौशल्य विकास केंद्र

पालकमंत्री रविंद्रजी चव्हाण यांची संकल्पना आणि अर्थसहाय्य

सुतारकाम आणि गवंडीकाम या कौशल्याचे सहा महिने मिळणार मोफत प्रशिक्षण

सिंधुनगरी | प्रतिनिधी : शिक्षणामुळे निर्माण होत असलेली बेरोजगारी दूर करण्यासाठी कौशल्य शिकवून रोजगार देण्याची पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांची संकल्पना आता सिंदूर जिल्ह्यात मूर्त स्वरूपात येत आहे. शास्त्रशुद्ध गवंडी व सुतार असा सहा महिन्याचा अभ्यासक्रम शिकविणारे कौशल्य विकास केंद्र 26 जानेवारीला सुरु होत आहे. सिंधुनगरी येथील ओरोस हायस्कूलच्या प्रांगणात ही वास्तु उभी राहत आहे. या पहिल्या बॅचमध्ये प्रवेश घेणाऱ्या उमेदवारांनी भाजप जिल्हा कार्यालय अथवा भगीरथ प्रतिष्ठान येथे नाव नोंदणी करावी असे आवाहन भाजपाचे जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत व भगीरथ प्रतिष्ठानचे अध्यक्ष डॉक्टर प्रसाद देवधर यांनी संयुक्तपणे केले आहे.

संपूर्ण देशभर कौशल्य विकासावर आधारित शिक्षणाकडे सध्या कल वाढलेला दिसत आहे.या अनुषंगाने अनेक कौशल्यांवर आधारित छोटे छोटे अभ्यासक्रम आणि योजना सुरू होत आहेत.जिल्ह्यातील बेरोजगार युवकांनी याचा लाभ घ्यावा यासाठी वेगवेगळ्या पातळीवर प्रयत्न सुरू आहेत. हे घडत असताना ज्या कौशल्याना जिल्ह्यात व जिल्ह्याबाहेर मोठी मागणी आहे व त्या प्रकारचे प्रशिक्षण घेणारे प्रशिक्षणार्थी जिल्ह्यात मोठ्या संख्येने उपलब्ध आहेत अश्या सुतारकाम व गवंडीकाम या विषयांचे सहा महिन्यांचे अद्यावत शास्त्रशुद्ध प्रशिक्षण देण्याचा माननीय पालकमंत्री यांचा मानस होता.

पालकमंत्री यांनी हा केवळ मानस न ठेवता या विषयांचे प्रशिक्षण केंद्र उभारण्याचा निर्णय घेतला आणि तातडीने सिंधुदुर्ग नगरी येथे एक अद्यावत केंद्र उभारणीचे काम सुटू केले.या केंद्राचे काम अंतिम टप्यात असून येत्या 26 जानेवारी रोजी शुभारंभ करण्यात येणार आहे. जिल्ह्यात सामान्य प्रकारचे सुतारकाम आणि गवंडीकाम करणारी मंडळी मोठ्या प्रमाणावर आहेत.परंतु विशेष असे फर्निचर किंवा आधुनिक पद्धतीचे बांधकाम करण्यासाठी कारागीर उपलब्ध नाहीत.जिल्ह्यातील या कारागीर मंडळींना सहा महिन्यांचे शास्त्रशुद्ध प्रशिक्षण उपलब्ध करून दिले तर त्यांना जास्त मोबदला मिळणारा रोजगार जिल्ह्यात आणि गरज असेल तर जिल्ह्याबाहेर मिळू शकतो.

स्वतःचा व्यवसाय सुद्धा ही मंडळी करू शकतात.असा उद्देश या केंद्र निर्मितीमागे आहे.या केंद्रात तीस तीस प्रशिक्षणार्थ्यांच्या दोन बॅच सुरू करण्यात येणार आहेत. दर सहा महिन्यांनी पुन्हा नवीन प्रवेश होतील. पुणे सासवड येथे ‘कॉज टू कनेक्ट’ या संस्थेचे ‘हुनर गुरुकुल’ या नावाने एक केंद्र सुरू असून मा पालकमंत्री यांनी त्या संस्थेवर या प्रशिक्षणाची जबाबदारी सोपविली आहे.संस्थेचे अनिरुद्ध बनसोड यांनी प्रशिक्षणार्थी निवडीचे काम सुरू केलेले आहे.

जिल्ह्यात अश्या विषयांना आकार देणारी भगीरथ ग्रामविकास प्रतिष्ठान याबाबत सर्व संस्थांमधील समन्वयाचे काम करत आहेत.कसाल शिक्षण संस्था आणि जिल्हा परिषद सिंधुदुर्ग यांचाही या विषयात सक्रिय सहभाग आहे. मा. पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांच्या आग्रहाने आणि सौजन्याने जिल्ह्यात प्रथमच अश्या प्रकारच्या अद्यावत प्रशिक्षणाची संधी उपलब्ध होत आहे. जिल्ह्यातील युवकांनी याचा अवश्य लाभ घ्यावा व आपल्या अंगी असलेल्या किंवा आवडीच्या कलेमध्ये पारंगत व्हावे,जेणेकरून त्यांना विशेष अश्या व्यवसाय तसेच रोजगाराच्या संधी उपलब्ध होतील.

हे केंद्र जिल्ह्याच्या मध्यवर्ती ठिकाणी प्रथम सुरू होत असून प्रत्येक तालुक्यात अशी केंद्रे पालकमंत्री यांच्या माध्यमातून लवकरच उभी रहात आहेत,त्याची प्रक्रिया सुरू आहे. जिल्ह्यातील अश्या विषयांचे सहा महिन्यांचे मोफत प्रशिक्षण घेऊ इच्छिणाऱ्या युवकांनी भाजपा कार्यालय,वसंत स्मृती तसेच भगीरथ ग्रामविकास प्रतिष्ठान झाराप या कार्यालयाशी संपर्क करावा असे आवाहन प्रभाकर सावंत व डॉ प्रसाद देवधर यांनी केलेले आहे.

रोजगार निर्मितीची एक चळवळ

दहावी बारावीनंतर विशिष्ट कौशल्य प्रशिक्षण मिळावे म्हणून जिल्ह्यातील विद्यार्थी आय टी आय प्रवेशाच्या रांगेत असतात. ज्यांना तिथे प्रवेश मिळत नाही असे विद्यार्थी केवळ पर्याय म्हणून कॉलेजला प्रवेश घेतात आणि अभिरुची नसताना आयुष्यातील काही वर्षे वाया घालवितात.असे विद्यार्थी या प्रशिक्षण केंद्राकडे वळले तर जिल्ह्यात शाश्वत अश्या कौशल्य विकासाची मोठी चळवळ उभी राहील