महावितरणच्या बेजबाबदार अभियंत्यांची तात्काळ बदली करा

 

सामाजिक कार्यकर्ते देव्या सुर्याजी यांची पालकमंत्र्यांकडे मागणी

सावंतवाडी । प्रतिनिधी : महावितरणचे अभियंता विनोद पाटील यांच्याबद्दल वीज वितरण ग्राहकांच्या वाढत्या तक्रारी आहेत. जिल्ह्यात महावितरणच्या दुर्लक्षामुळे वित्त व मानवी हानी होत आहे. याला सर्वस्वी जबाबदार महावितरणचे स्थानिक अधिकारी आहेत‌. विनोद पाटील यांच्या बेजबाबदारपणामुळे व कर्मचाऱ्यांवर वचक नसल्यामुळे आजवर अनेक मनुष्य बळी, प्राण्यांचे बळी गेले आहेत. आजही महावितरणच्या कर्मचाऱ्यांला शॉक लागून तो पोलवरून कोसळला आहे. त्यामुळे अभियंतांची तात्काळ बदली करण्यात यावी अशी मागणी युवा रक्तदाता संघटनेचे अध्यक्ष देव्या सुर्याजी यांनी पालकमंत्री रविंद्र चव्हाण यांच्याकडे केली आहे.

 

अद्यापही गंजलेले विद्यूत पोल, मेन लाईनवर झाड तशीच आहे‌. पावसापूर्वी दक्षता घेतलेली नाही. त्यामुळे हानीची शक्यता नाकारता येत नाही. बळींना कारणीभूत ठरणाऱ्या अभियंता पाटील त्यांच्यावर सदोष मनुष्य वधाचा गुन्हा दाखल करण आवश्यक आहे. ग्राहकांनी लक्ष वेधून देखील परिस्थिती न सुधारल्याने हे जीव गेले आहेत‌‌. त्यामुळे अशा बेफीकीर अधिकाऱ्याची तात्काळ बदली करून कारवाई करण्यात यावी. अन्यथा भविष्यात बळी गेल्यास त्यास सर्वस्वी महाराष्ट्र शासन जबाबदार राहील याची नोंद घ्यावी, यातून जनतेचा उद्रेकास सामोरं जावं लागेल. त्यामुळे या मागणीची तात्काळ दखल घेत ग्राहकहीत व समाजभान असणारा अधिकारी या ठिकाणी नेमण्यात यावी अशी मागणी युवा रक्तदाता संघटनेचे अध्यक्ष देव्या सुर्याजी यांनी पालकमंत्री रविंद्र चव्हाण यांच्याकडे केली आहे.

 

यासह महावितरणमुळे वाढत्या मनुष्य व वित्त हानीबद्दल शिक्षणमंत्री दीपक केसरकर, ऊर्जामंत्री देवेंद्र फडणवीस व मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचंही लक्ष वेधणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.