जिल्हा पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी यांनी केले आवाहन
रत्नागिरी| प्रतिनिधी : कोकणामध्ये पर्यटकांना जाण्यास कोणत्याही प्रकारची मनाई नसल्याचे माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी यांनी स्पष्ट केले आहे. कोकणामध्ये कोणत्याही प्रकारचा असुरक्षेचा वातावरण नाही, जिल्ह्यामध्ये सर्वच पर्यटकांचा स्वागत आहे, रत्नागिरी जिल्ह्यामध्ये पर्यटकांना मनाई आदेश जारी करण्यात आल्याचे कोणतेही निर्देश देण्यात आलेले नाहीत, दिलेले निर्देश हे केवळ राजकीय आंदोलने, राजकीय सभा, मोर्चे याकरता लागू आहेत. तसेच खोट्या व बनावट बातम्यांवर विश्वास ठेवू नये तसेच खात्री केल्याशिवाय इतरांना फॉरवर्ड करू नयेत असं आवाहन पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी यांनी दिले आहेत.
जिल्ह्यात अप्पर जिल्हा दंडाधिकारी यांनी 27 एप्रिल 2023 च्या मध्यरात्रीपासून 11 मे 2023 च्या मध्यरात्रीपर्यंत संपूर्ण जिल्ह्यात महाराष्ट्र पोलीस कायदा 1951 चे कलम 37 (1) (3) प्रमाणे प्रतिबंधात्मक मनाई आदेश जारी केले आहेत. या आदेशानुसार शारीरिक दुखापत करण्यासाठी वापरता येतील अशी हत्यार,सोटे, तलवारी, बंदुका, सुरे, लाठ्या, अगर कोणतीही वस्तू घेऊन फिरणं, अंग भाजून टाकणारा कोणताही दाहक किंवा स्फोटक पदार्थ घेऊन फिरणं, दगड किंवा इतर शस्त्रे हत्यारे किंवा शस्त्र फेकायची साधन बरोबर घेऊन फिरणं, गोळा करणे किंवा तयार करणे, सभ्यता अगर नीती याविरुद्ध अशी किंवा शांतता धोक्यातील अशी भाषणं करणं अगर सोंग करणं, अगर कोणतीही वस्तू किंवा जिन्नस तयार करणे आणि लोकांमध्ये प्रसार करणं, इसम अगर प्रेत किंवा आकृती यांच्या प्रतिमांचे प्रदर्शन करणे, सार्वजनिक रितीने घोषणा करणे, गाणी वाद्य वाजवणं, पाच किंवा पाचपेक्षा जास्त इसमाना विनापरवानगी एकत्रित जाणं या गोष्टींना मनाई करण्यात आली आहे.
मात्र अंतयात्रा, धार्मिक विधी, लग्न सोहळा, सामाजिक सण, शासकीय कार्यक्रम इत्यादी, शासकीय सेवेत तैनात कर्मचारी, सार्वजनिक कर्मणुकीची सिनेमागृह, रंगमंच याला हे आदेश लागू नाहीत प्रतिबंधात्मक कालावधीमध्ये कोणताही मोर्चा, मिरवणूक तसेच सभा निवडणूक प्रचार सभेचे आयोजन करायचं असल्यास उपविभागीय दंडाधिकारी यांची लेखी परवानगी घेणं आवश्यक असल्याचं जिल्हाधिकारी कार्यालयातून देण्यात आलेल्या मनाई आदेशामध्ये नमूद करण्यात आला आहे. मनाई आदेशाच्या कालावधीत रत्नागिरी जिल्ह्यातील सर्व नागरिकांना या निर्गमित आदेशातील तरतुदीचा पालन तसेच कायदा सुव्यवस्था अबाधित राखण्याकरता सहकार्य करण्याचा आवाहन कुलकर्णी यांनी केलं आहे.