महायुतीचे तिन्ही उमेदवार मोठ्या मताधिक्याने होतील विजयी : अशोक दळवी 

 

 

 

राजन तेली जनतेने वारंवार नाकारलेले उमेदवार  

ही निवडणूक वाईट प्रवृत्ती विरुद्ध कर्तुत्ववान जनसेवक अशी

सावंतवाडी । प्रतिनिधी : सावंतवाडी विधानसभा मतदारसंघाची निवडणूक ही निवडणूक वाईट प्रवृत्ती विरुद्ध कर्तुत्वान कार्यसम्राट जनसेवक अशीच होत आहे. जनतेने वारंवार नाकारलेले पुन्हा निवडणूक लढवीत आहेत. तर दुसरीकडे केसरकर यांनी गेल्या पाच वर्षात अडीच हजार कोटी रुपयांचा निधी मतदार संघासाठी आणला. त्यांचे कार्य, विनयशीलता, महायुतीची भक्कम साथ, माजी मुख्यमंत्री न खासदार नारायण राणे व पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांची त्यांना असलेली साथ यामुळे त्यांचा विजय निश्चित असून सिंधुदुर्ग जिल्ह्यातील तिन्ही जागांवर महायुतीचे उमेदवार एकतर्फी निवडून येतील, असा विश्वास शिवसेनेचे जिल्हाप्रमुख अशोक दळवी यांनी व्यक्त केला.

ते म्हणाले, मंत्री केसरकर यांनी पंधरा वर्षाच्या आमदारकीच्या कालावधीत करोडो रुपयांचा निधी मतदार संघासाठी आणला. गेल्या पाच वर्षात अडीच हजार कोटीचा निधी आणला.त्यांच्याकडे समस्या घेऊन येणाऱ्या प्रत्येकाच्या समस्या सोडविण्याच्या त्यांनी प्रयत्न केला. त्यामध्ये तो कोणत्या पक्षाचा आहे, याचा विचार केला नाही. त्यांच्या कार्याचा राज्यभर दबदबा आहे. राज्यातील महत्त्वाच्या निर्णय प्रक्रियेत त्यांचा सहभाग असतो . हे आपल्या मतदारसंघाचे भाग्य आहे. त्यांना राज्यभर मिळणारा मान व त्यांच्या कर्तृत्वाचा काही जणांना पोटशुळ उठला असल्यामुळे विरोधक त्यांच्यावर उठसुट टीका करीत असल्याचे दळवी म्हणाले.

केसरकरांच्या विरोधी उमेदवार राजन तेली हे जनतेने वारंवार नाकारलेले उमेदवार आहेत. याउलट केसरकर यांनी नगरसेवक, नगराध्यक्ष , सहकारी बँक, आमदार अशा सर्व निवडणुका एकतर्फी जिंकल्या आहेत. तेली याना जिल्हा परिषद निवडणुकीतही पराभवाचा सामना करावा लागला होता. जिल्हा परिषद , जिल्हा बँक निवडणुकीत सलग दोन वेळा पराभव, विधानसभा निवडणुकीत सलग दोन वेळा पराभव अशा प्रत्येक निवडणुकीत त्यांना जनतेने नाकारलेले आहे. ते आज केसरकरांवर टीका करीत आहेत.पण केसरकर हे जनतेच्या मनातील आमदार आहेत , मंत्री आहेत. जनतेला ते आपलेसे वाटतात कारण मतदारसंघातील प्रत्येकासाठी आधारवड बनवून काम केलंय . अनेक रुग्णांना वैयक्तिक पातळीवर त्यांनी मदत केली असल्याचे ते म्हणाले.

 

तर काही माणसे पैशाने मतदारांना विकत घेण्याची स्वप्न रंगवत आहेत. त्यांची ही स्वप्नच राहतील. तुमचा या मतदारसंघाशी काय संबंध आहे. तुम्ही पैसा कसा कमावला मात्र जनतेसाठी काय केलात हे सर्व जनतेला माहित आहे. पावसाळ्यात जशी अळंबी येतात, तशी निवडणूक आली की अशा प्रवृत्ती डोके वर काढत असतात त्यामुळे अशा प्रवृत्तीला जनताच मतपेटीचे उत्तर देणार असल्याचे दळवी म्हणाले.

ते म्हणाले, केसरकर यांच्या कार्यालयाचे दरवाजे जनतेसाठी नेहमीच उघडे असतात. सामान्य मतदारांचा फोनही ते रिसिव्ह करतात. सामान्य माणूस समोर दिसला तर ते आपली गाडी थांबवून त्याची आस्थेने व प्रेमाने चौकशी करतात. मात्र, काही जणांकडे कोणतेही लोकनियुक्त पद नसताना सुद्धा त्यांच्या कार्यालयात जाण्यासाठी सुरक्षेचे कडे ओलांडून जावे लागते. फोन तर हे कोणाचे घेतच नाहीत.आज त्यांचा एवढा रुबाब तर आमदार झाल्यावर त्यांची काय स्थिती असेल असा प्रश्न आज जनताच विचारत आहे.

 

या मतदारसंघात केसरकर यांच्या विरोधात बाहेरची माणसे निवडणूक लढवीत आहे. त्यांना जनतेचे देणेघेणे नाही फक्त त्यांच्या नसानसात स्वार्थ भिनला आहे. अशा स्वार्थी लोकांना जनता ओळखून आहे . या प्रवृत्तीला मतपेटीतून धडा शिकवल्याशिवाय जनता राहणार नाही.

आपल्या प्रेमळ व विनम्र व्यक्तिमत्त्वामुळे केसरकर जनतेच्या मनातील आमदार मंत्री बनले आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बंडाच्या काळात त्यांनी शिवसेनेची प्रभावी बाजू मांडली हे संपूर्ण देशाने पाहिले. त्यांचे सर्व भाषा वरील प्रभुत्व सर्वांनी पाहिले . कुठचाही आरोप प्रत्यारोप यामध्ये न अडकता शांतपणे जनतेचा विकास या एकाच ध्येयाने प्रेरित होऊन केसरकर साहेब सतत कार्यरत असतात . अशा या कार्यसम्राट जनसेवकाला महाराष्ट्रातील नंबर एकचे मताधिक्य देऊन इतिहास घडवूया , असे आवाहनही जिल्हाप्रमुख अशोक दळवी यांनी मतदारांना केले.

 

जिल्ह्यात महाविकास आघाडीचे होईल पानिपत : अशोक दळवी

 

सिंधुदुर्ग जिल्ह्यात महाविकास आघाडीचे पानिपत होणार आहे. जिल्ह्यातील तिन्ही जागांवर महा युतीचे वर्चस्व राहणार आहे. सावंतवाडी , दोडामार्ग,वेंगुर्ले मतदार संघातून दीपक केसरकर तसेच कुडाळ मालवण मधून युतीचे उमेदवार निलेश राणे तर देवगड, कणकवली ,वैभववाडी मधून युतीचे नितेश राणे हे तिन्ही उमेदवार मोठ्या फरकाने विजयी होतील असा ठाम विश्वासही अशोक दळवी यांनी व्यक्त केला.