रत्नागिरी : महात्मा गांधीजींच्या विचारप्रणाली नुसार खरा भारत देश हा खेड्यात नांदतो. त्यांच्या खेड्याकडे चला या विचारानुसार ग्रामीण जीवनाचा अनुभव मिळावा म्हणून अभ्यंकर कुलकर्णी कनिष्ट महाविद्यालय, रत्नागिरीच्या राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे विशेष निवासी श्रमसंस्कार शिबीर कुर्धे गावातील राधा पुरुषोत्तम पटवर्धन माध्यमिक विद्यालयात सुरू आहे. या शिबिरात 11वी आणि 12वी मधील 63 विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला आहे. ‘ग्राम विकासातून व्यक्तिमत्व विकास’ या संकल्पनेला अनुसरून विविध उपक्रमांचे आयोजन शिबिरात केले आहे.
स्वयंसेवकांनी कुर्धे गावातील शेतकरी श्री. शशिकांत लिंगायत यांच्या शेतात भात कापणीचा अनुभव घेतला. यावेळी स्वयंसेवकांनी भात शेती लागवडीची संपूर्ण माहिती करून घेतली. भात शेतीसाठी वापरलेले बियाणे, खते याची माहिती करून घेतली. यावर्षी कोमल हे 100 ते 120 दिवसात होणारे बियाणे पेरले आहे. शेण खताचा वापर करून सेंद्रिय शेतीचा पुरस्कार त्यांनी केला आहे. शेतीची माहिती घेत असताना विद्यार्थ्यांना शेतात काम करीत असताना किती श्रम पडतात याची जाणीव झाली. भात कापताना डोक्यावर तळपणारा सूर्य, भाताची लागणारी खाज, भातातील विविध कीटक, कसरुंड, यांचा होणारा त्रास अनुभवला आणि ताटात उपलब्ध अन्नापाठी किती श्रम आहेत हे मुलांना कळले.
या उपक्रमाच्या यशस्वीतेसाठी कुर्धे गावातील श्री. शशिकांत लिंगायत सौ. स्वप्नजा लिंगायत यांनी सहकार्य केले व मुलांना अल्पोपहार दिला. सर्व स्वयंसेवक व कार्यक्रमाधिकारी भात कापणीत मनापासून सहभागी झाले. कार्यक्रमाधिकारी प्रा. निनाद तेंडुलकर यांनी सर्वांचे आभार मानले.










