रत्नागिरी तालुक्यातील नांदिवडे – जयगड येथील श्री लक्ष्मीनारायण उत्सवाची सांगता

 

रत्नागिरी : शेकडो वर्षांची परंपरा असलेला नांदिवडे – जयगड येथील श्री लक्ष्मीनारायण उत्सव दि. 11 नोव्हेंबर, 2024 ते 15 नोव्हेंबर, 2024 अखेर साजरा करण्यात आला.

दरवर्षी हा उत्सव कार्तिक शुद्ध दशमी ते कार्तिक शुद्ध पौर्णिमा या काळात साजरा केला जातो. या उत्सवाचे वैशिष्ट्य असे की परंपरेने हा उत्सव टिळक पंचांगाप्रमाणे आखला जातो. यंदाचा हा उत्सव वैशिष्ट्यपूर्ण होता कारण गावच्या सर्व माहेरवाशीणी माता – भगिनींना समर्पित असा उत्सव होता. संपूर्ण पंचक्रोशीतच नाही तर सर्व गावांमध्ये प्रचलित उत्सवांमध्ये माहेरवाशीणी माता भगिनींसाठी आयोजित असा हा पहिलाच उत्सव असावा.

दि. 11 नोव्हेंबर ते 15 नोव्हेंबर, 2024 या उत्सव काळात विविध कार्यक्रमांचे आयोजन केले होते. यात प्रति वार्षिक कार्यक्रम सोडून श्री सत्य शंकर, श्री सत्य दत्त पूजा, श्री सत्यनारायण पूजा, श्री सत्य गजानन पूजा, श्री सत्य विनायक पूजा असे वेगळे धार्मिक कार्यक्रम पार पडले. उत्सवाच्या पहिल्या दिवशी म्हणजेच 11 तारखेला प्रथेप्रमाणे श्री गणेश व श्री लक्ष्मी नारायणाची षोडशोपचार पूजा व आवाहन आदि धार्मिक विधी आटोपल्यावर उपस्थित माहेरवाशिंणचे स्वागत करण्यात आले. त्याच दिवशी रात्री आरत्या भोवत्या, कीर्तन असे कार्यक्रम झाले . 12, 13, 14 नोव्हेंबर, 2024 या तीन दिवसांतही श्री देव लक्ष्मी नारायणावर पवमान तसेच श्री देवी जोगेश्वरी वर श्री सूक्त एकादशणी – श्री देव नागेश्वरावर रुद्राचाअभिषेक रात्री आरत्या, भोवत्या, महाराणा प्रताप यांच्यावर व्याख्यान, माहेर पूजन, आवळी पूजन व भोजन – तुलसी विवाह हळदीकुंकू, फनिगेम, विविध गुणदर्शन कार्यक्रम आयोजित केले गेले.

कार्यक्रमाची सांगता 15 नोव्हेंबर, 2024 रोजी पवमान – महाप्रसाद – सायंकाळी त्रिपूर लावणे – रात्री आरत्या भोवत्या – नाटक आणि लळीताचे कीर्तन अशी झाली. असा हा यंदाचा आगळा वेगळा उत्सव सर्व माहेरवाशीण भगिनींना भावून गेला. अतिशय नियोजनबद्ध पद्धतीने या उत्सवाची आखणी करण्यात मंदिराची कार्यकारिणी यशस्वी झाली. या उत्सवाच्या निमित्ताने उपस्थित माहेरवाशीणी भगिनींनी सर्व कार्यक्रमांचा आनंद मनमुराद लुटला. माहेर पूजन, तुलसी विवाह व आवळीपूजन व भोजन हे या उत्सवाचे खास आकर्षण ठरले. यावर्षी सुमारे 50 माहेरवाशिणी उपस्थित होत्या (या पिढीतल्या व मागील पिढीतल्या मिळून) सर्व माहेरवाशिणींना स्मृतीचिन्ह देण्यात आले. एकूण पुढे अनेक वर्ष लक्षात राहील असा देखणा उत्सव साजरा झाला.