महाराष्ट्रात गोहत्या बंदी आणावी,गो मातेची तस्करी थांबवावी

कुडाळ मालवणचे आमदार निलेश राणे यांनी विधानसभेत केली मागणी

कुडाळ मालवण मतदार संघातील शेतकरी, मच्छीमार,पर्यटन,पर्यावरण,रोजगार,आरोग्याचे अभ्यासपूर्ण मांडले प्रश्न

विधानसभेत राज्यपालांच्या अभिभाषणावर चर्चेत मांडले लक्षवेधी मुद्दे

संतोष राऊळ;नागपूर

महाराष्ट्रात गोहत्या थांबली पाहिजे.
आपलं सरकार बहुमतात आहे. हिंदुत्वाचं सरकार आहे. त्यामुळे आज आपण आपल्या गोमातेचे संरक्षण करू शकलो नाही तर आपण कुठल्या सरकारकडे ही मागणी करणार आहोत. त्यामुळे गोहत्या थांबली पाहिजे. गो मातेची तस्करी थांबली पाहिजे आणि जे याला जबाबदार आहेत त्यांच्यावर कडक कारवाई झाली पाहिजे अशी मागणी कुडाळ मालवण चे आमदार निलेश राणे यांनी महाराष्ट्रात गोहत्या बंदी आणावी अशी मागणी विधानसभेत केली.

गोहत्येचा व्यापार थांबवला जात नाही आणि या लोकांवर कारवाई केली नाही तर उद्या कुणाला तरी कायदा हातात घ्यावा लागेल अशी परिस्थिती आहे.असं सांगत कुडाळ मालवण चे आमदार निलेश राणे यांनी महाराष्ट्रात गोहत्या बंदी आणावी अशी मागणी विधानसभेत केली आहे.

राज्यपालांच्या अभिभाषणावरील चर्चेत निलेश राणेंनी हा मुद्दा मांडला. ते म्हणाले की, महाराष्ट्रात गोहत्या थांबली पाहिजे. राज्यपालांच्या अभिभाषणात जरी याचा उल्लेख नसला तरी माझ्या मतदारसंघात, आणि बाजूच्या रत्नागिरी जिल्ह्यात हे उघड चाललंय. यांचे रॅकेट आहे ते उघड धंदे करतात. आंदोलने केली तरी हे थांबत नाही. अनेक आंदोलने झाली. आंदोलनात गुन्हे झाले परंतु गोहत्या थांबत नाही. गोहत्येचा व्यापार थांबवला जात नाही. या लोकांवर कारवाई केली नाही तर उद्या कुणाला तरी कायदा हातात घ्यावा लागेल अशी परिस्थिती आहे.

वन्यप्राण्यांचा बंदोबस्त करा, नुसते बांबू लागवडीबाबत आवाहन नको
सह्याद्री पट्ट्यात कोकणातील सर्वच भागात शेतकऱ्यांनी बांबू लागवड केली आहे. मात्र, बांबूचे कोंब खावून माकड व इतर जनावरांकडून नुकसानी केली जाते. त्यामुळे या रानटी जनावरांचा बंदोबस्त वनविभागाकडून केला जात नाही. परिणामी बांबू लागवड करण्यासाठी शेतकरी पुढे येत नाही. बांबू लागवड थांबली आहे. त्यामुळे सरकारने या विध्वंस करणार्यां रानटी जनावरांचा बंदोबस्त करावा, अशी आग्रही मागणी कुडाळ विधानसभा मतदारसंघातील आमदार नीलेश राणे यांनी केली.

विधानसभा अधिवेशनामध्ये राज्यपालांच्या अभिभाषणावर अभिनंदनपर बोलताना आमदार नीलेश राणे यांनी भाषणातील बहुतांश मुद्यांवर अभ्यासपूर्ण विवेचन केले. नीलेश राणे म्हणाले, शासनाने बांबू लागवडीबाबत उद्दिष्ट ठेवले आहे. मात्र, बांबू लागवडीबाबत वस्तूस्थिती लक्षात घेणे आवश्यक आहे. नुसती बांबू लागवड करा म्हणून आवाहन करताना कोकणातील विशेष करून कुडाळ तालुक्यातील माणगाव खार्यातील शेतकरी बांबू लागवडीपासून दूर चालला आहे. कारण बांबू लागवडीनंतर बांबूचे झाड मोठे झाल्यानंतर बांबूचा कोंबच माकड खावून नष्ट करतात त्यामुळे शेतकरी यांनी बांबूची शेती करणे सोडून दिले आहे.

वनविभाग काय करते ?
सिंधुदुर्ग जिल्ह्यात राज्यातील सर्वाधिक वनक्षेत्र आहे. जिल्ह्यात राज्यातील सर्वाधिक सरासरी ४ हजार मिलीमीटर पाऊस पडतो. बांबू लागवड सुद्धा मोठी आहे. मात्र वन्यप्राण्यांचा बंदोबस्त करणारी वनविभागाची यंत्रणा काय करते ?, वनाधिकारी यांनी वन्यप्राण्यांचा बंदोबस्त करायला हवा. सरकारने वनविभागाच्या माध्यमातून जनावरांचा बंदोबस्त करणे आवश्यक आहे.

जपान प्रमाणे मॅन्युफॅक्चरिंग सेक्टरमध्ये राज्यात रोजगार निर्माण होतील
आपल्या राज्यात टुरीझम सेक्टर, मॅन्युफॅक्चरिंग सेक्टरमध्ये भरीव काम करणे आवश्यक आहे. यातून नोकर्या निर्माण होवू शकतात. आपल्या महाराष्ट्र राज्याचे ३ लाख, ७ हजार स्क्वेयर किलोमीटर क्षेत्रफळ आहे. तर प्रगत जपान या देशाचे ३ लाख, ७० हजार स्क्वेयर किलोमीटर क्षेत्रफळ आहे. त्यामुळे जपानने जशी प्रगती साधली तशी आपल्यालाही साधण्याची संधी आहे.

आरोग्य व्यवस्था सुधारा
सरकारने २०१९ मध्ये सिंधुदुर्ग जिल्ह्यात मेडिकल कॉलेज मंजूर करून सुरू केले. मात्र जिल्हा रूग्णालय त्यात विलीन करून एक ना धड भाराभर चिंध्या प्रमाणे आरोग्य विभागाची अवस्था झाली आहे. येथे व्यवस्थित कुठलेही उपचार मिळत नाहीत. कारण रिक्तपदांचा मोठा प्रश्न आहे. ५० टक्के व्यवस्थेवर सगळ सुरू आहे. ज्याठिकाणी १३० डॉक्टर हवे तेथे ३० डॉक्टर, १०८ क्लार्कच्या ठिकाणी ८ तर ४०० नर्सच्या ठिकाणी ३८ जण काम करतात मग गोरगरीबांना सेवा कशी मिळणार? असा प्रश्नच आहे.

पर्यटनामध्ये गुंतवणूक हवी
कोकणाला सुंदर किनारपट्टी लाभली आहे. मात्र पायाभूत सुविधा नाहीत. पर्यटनामध्ये आपण मोठी गुंतवणूक करायला हवी. आपण मार्केटिंगमध्ये कमी पडतो. आरोग्य, शिक्षण याप्रमाणे पर्यटनाला महत्व दिले पाहिजे.

सीआरझेडभध्ये शिथिलता हवी
मालवणमधील देवबाग किनारपट्टी जागतिक दर्जाची आहे. मात्र, सीआरझेडच्या अडचणीमुळे धूप प्रतिबंधक बंधारा बांधणेदेखील कठीण बनले आहे. येथील जमीन समुद्र गिळंकृत करत आहे. त्यामुळे राज्य शासनाने सीआरझेडमध्ये शिथिलता आणण्यासाठी प्रयत्न करणे आवश्यक आहे.

राजकोट घटनेची सखोल चौकशी करा
मालवण येथील राजकोट किल्ला दुर्घटना प्रकरणी माजी आमदार घटनास्थळी पंधरा मिनिटात कसे पोहोचले ? त्या घटनेदरम्यानचे माजी आमदार आणि सहकार्यांचे सिडीआर चेक करा अशी आपली पहिल्या दिवसापासूनची मागणी आहे. आज सभागृहात हा विषय पुन्हा आल्याने आपण चौकशीच्या त्याच मागणीवर ठाम आहे.