मुंबई–गोवा महामार्गावर पुन्हा दुर्घटना
खेड (प्रतिनिधी) – मुंबई–गोवा महामार्गावरील भरणे नाका येथे पहाटेच्या सुमारास भीषण अपघात घडला असून भरधाव वेगाने येणाऱ्या वॅगन आर कारने रस्त्यावर उभ्या असलेल्या 14 चाकी ट्रकला पाठीमागून जोरदार धडक दिली. हा अपघात पहाटे सुमारे 3.05 वाजण्याच्या सुमारास घडला.
या अपघातात कारमधील एकूण सहा जण जखमी झाले असून त्यामध्ये तीन महिलांसह एका लहान बालकाचाही समावेश आहे.
जखमींमध्ये जयेश राज शर्मा (वय 27, नवी मुंबई), अशा श्रीनिवास नायडू (वय 80, भांडुप), सुरेखा श्रीनिवास नायडू (वय 48, भांडुप), तीर्थ जितेंद्र ठाकूर (वय 18, भांडुप), प्रिय श्रीनिवास नायडू (वय 1, भांडुप) आणि योगिता सतीश नायडू (वय 38, भांडुप) यांचा समावेश आहे.
या अपघातानंतर स्थानिक नागरिकांनी तात्काळ मदत करत जखमींना बाहेर काढले आणि त्यांना उपचारासाठी यश मल्टी स्पेशलिस्ट हॉस्पिटल येथे जगदगुरु रामानंदचार्य श्री नरेंद्राचार्य जी महाराज संस्थांच्या रुग्णवाहिकेने दाखल करण्यात आले आहे. जखमींची प्रकृती स्थिर असल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे.
दरम्यान, वीकेंडला लागून आलेल्या सलग सुट्ट्या तसेच सुरू असलेल्या लग्नसराईमुळे मुंबई–गोवा महामार्गावर, विशेषतः गोव्याच्या दिशेने जाणाऱ्या मार्गावर वाहनांची मोठ्या प्रमाणात वर्दळ वाढली आहे. वाढत्या वाहतुकीच्या ताणामुळे अपघातांची शक्यता वाढत असल्याचे बोलले जात असून वाहनचालकांनी वेगावर नियंत्रण ठेवून सावधगिरी बाळगण्याचे आवाहन करण्यात येत आहे.












