माकडे, वानरांचा मानवी वस्तीत उच्छाद
गुहागर l प्रतिनिधी : एकेकाळी जिथे जागा भेटेल त्या ठिकाणी घरापासून दूर रानातही अवघड जागा साफ करून विविध प्रकारची पिके घेणारा शेतकरी गेल्या दहा- पंधरा वर्षात रानाकडे सुद्धा फिरकत नसल्याने रानातील शेती ही संकल्पनाच विसरून गेला आहे. रानटी प्राण्यांच्या उपद्रवामुळे व त्या नुकसानीमुळे रानातली शेती शेतकरी विसरून गेला असला तरी या प्राण्यांचे आक्रमण आता मानवी वस्तीवर होऊ लागले आहे. घराच्या परस बागेत लावलेल्या भाजीपाला ही आता हे प्राणी ओरबाडू लागले असून शेतकऱ्यांच्या घरावरील पत्रे, कौले या छपरांची ही नासधूस होत असल्याने ग्रामीण भागातीळ शेतकरी यामुळे हैराण झाला आहे.
काही वर्षापूर्वी शेतकरी रानात डोंगर उतारावर वाढलेली झाडे तोडून व जागा साफ करून फुले, भाजीपाला व तो बियायांची शेती करायचा. गणपती काळात रानातला डोंगर उतारतील फुलांनी सजविलेल्या सारखा मनमोहक दिसायचा. नागली वरीच्या शेतात गवार, काकडी, चिबूड, कारली, भोपळा, दुधी अशा जेवणात आवश्यक असणाऱ्या भाज्या हमखास पिकवायचा. घरात आवश्यक असणाऱ्या वस्तू राखून बाकीच्या बाजारात विकल्या जायच्या व त्यांना गावठी भाजी म्हणून दरही चांगला मिळायचा. गुहागर तालुक्यातील काही मैदानी पठारावरच्या गावातून भुईमुगाची मोठ्या प्रमाणावर पेरणी व्हायची व पीक ही चांगले यायचे. मात्र नागलीवरी पाठोपाठ भुईमुगाचे पीक क्षेत्र मोठ्या प्रमाणावर कमी झाले आहे. पठारी भागात आता तीळ ही औषधाला सापडत नाही. नागली भात या बरोबरच जेवणासाठी आवश्यक असणाऱ्य सर्व वस्तू शेतकरी आपल्या शेतात पिकवायचा.
वन खात्याच्या नव्या नियमामुळे रानातील शेतीपेक्षा रानटी लाकडांना मोठे महत्व प्राप्त झाले. त्यामुळे शेती कमी झाली व रानातली जंगल तुटू लागली. त्यामुळे जंगल हाच अधिवास असलेल्य जंगली प्राण्यांचा रोजच्या अन्नाचा घास कमी होऊ लागला. उरल्य सुरल्या शेती पिकांवर त्यांचे आक्रमण होऊ लागले. व सततच्या त्यांच्या त्रासाला व होणाऱ्या नुकसानीला कंटाळून शेतकऱ्यांनी रानातल्य शेतीला रामराम केला.
मात्र रानटी प्राण्यांचा त्रास त्यानंतरही शेतकऱ्यांना भोगावा लागतच आहे. पावसाळ्यात घराच्या मागे परसबागेत मांडव घालून लावलेले काकडी, चिबूड, कारली, पडवळाचे वेल तोडून माकडे चोरून नेत आहेत. अंगणात तयार झाळेळी भेंडी व इतर भाजीपाला तयार होण्यापूर्वीच माकडे पळवतात. त्यांना कितीहि हाकलले तरी माकडांचा थवा दाद देत नाही. मोठ्या आशेने दारात लावलेल्या व जोपासलेत्या या पिकांची आपल्या डोळ्यादेखत होत असलेली नासाडी शेतक-यांना अस्वस्थ करून जाते. घराजवळ व इतर ठिकाणी भरपूर खर्च करून नारळ व पोफळीच्या तयार झालेल्या झाडांवर चढून माकडे तयार झालेले नारळ सोलून खातात व मोठ्या प्रमाणावर नुकसान करतात.











