Ashok Chavan : अशोक चव्हाणांच्या राजीनाम्यानंतर सोनिया गांधी सक्रिय; खर्गेंसोबत दीर्घकाळ चर्चा, बुधवारी महत्त्वपूर्ण घडामोड

मुंबई : माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्या राजीनाम्यानंतर काँग्रेसमध्ये अनेक वेगवान घडामोडी घडत असून काँग्रेसच्या आमदारांची महत्त्वाची बैठक बुधवारी (ता.१४) बोलावण्यात आली आहे. यादरम्यान, कॉंग्रेस नेत्या सोनिया गांधी आणि अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांच्यात राजधानीत दीर्घ काळ चर्चा झाली आणि त्यात महाराष्ट्राच्या राजकीय स्थितीचा आढावा घेण्यात आला.

अशोक चव्हाण यांच्या राजीनाम्यानंतर ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात आणि पृथ्वीराज चव्हाण यांनी तातडीने बैठक घेत खबरदारीबाबत चर्चा केली. त्यानंतर काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष नाना पटोले यांनी छत्तीसगडमध्ये ‘भारत जोडो न्याय’ यात्रेत राहुल गांधी यांची भेट घेतली.

यादरम्यान, चव्हाण यांच्या राजीनाम्यासंदर्भात पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांशी चर्चा करण्यासाठी ते नवी दिल्लीला गेले. पक्षातील या घडामोडींनंतर दिल्लीत काँग्रेसची महत्त्वाची बैठक मल्लिकार्जुन खर्गे यांच्या निवासस्थानी झाली. या बैठकीला काँग्रेस नेत्या सोनिया गांधी देखील उपस्थित होत्या. यावेळी त्यांनी महाराष्ट्रातील स्थितीचा आढावा घेतला. दरम्यान, राजीनामा देण्यापूर्वी अशोक चव्हाण यांनी नांदेड जिल्ह्यातील पाच विधानसभा मतदारसंघांत बूथ कमिटी प्रशिक्षण कार्यक्रमात नेते, पदाधिकारी व कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले होते. पाच फेब्रुवारीपासून प्रशिक्षण कार्यक्रमाचा पहिला टप्पा सुरू झाला होता. मात्र आता अशोक चव्हाण यांच्या राजीनाम्याने कॉंग्रेसला नव्याने रणनीती आखावी लागणार आहे.

Nitish Kumar : ‘JDU चे आमदार फोडण्यासाठी दहा-दहा कोटींची ऑफर’, तेजस्वी यादवांच्या निकटवर्तीयावर गुन्हा दाखल

प्रत्येक आमदारांशी संपर्क

येत्या बुधवारी मुंबईत काँग्रेस आमदारांची बैठक होणार आहे. माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्यासोबत नेमके किती आमदार आहेत याचा कानोसा या बैठकीच्या माध्यमातून घेण्यात येणार आहे. त्यासाठी काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांनी प्रत्येक आमदाराशी संपर्क साधण्यात आला. काँग्रेसचे नेमके किती आमदार अशोक चव्हाण यांच्यासोबत आहेत, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. अनेक आमदारांची नावे चर्चेत असली तरी अद्याप कोणीच उघड भूमिका घेतलेली नाही. या पार्श्वभूमीवर काँग्रेसने सर्व आमदारांची १४ तारखेला बैठक बोलावली आहे.

राज्यसभेचे काय ?

येत्या १५ फेब्रुवारीपर्यंत काँग्रेसला राज्यसभेसाठी उमेदवार निश्चित करावयाचा आहे. परंतु काँग्रेसमधील या स्थितीमुळे काँग्रेस आता स्वबळावर खासदार निवडून आणू शकत नाही, असे चित्र आहे. विधानसभेत काँग्रेसच्या ४५ आमदारांपैकी निवडणुकीपर्यंत किती काँग्रेससोबत राहतील, हेच अद्यापही स्पष्ट झालेले नाही. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा येत्या १५ फेब्रुवारी रोजी महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आहेत. यावेळी काही आमदार भाजपमध्ये प्रवेश करण्याची शक्यता आहे. यागणितामुळे भाजप राज्यसभेसाठी चार उमेदवार उभे करण्याच्या तयारीत असल्याचे समजते. यामुळे महाराष्ट्रातील राज्यसभेच्या उमेदवारांची यादी अद्यापही जाहीर करण्यात आलेली नाही. या यादीत आता अशोक चव्हाण यांचा समावेश असल्याचे बोलले जात आहे.

खर्गे पंजाबमधून लगेचच दिल्लीत

सोमवारी सकाळी माजी मुख्यमंत्री चव्हाण यांच्या राजीनाम्याची बातमी आली तेव्हा काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे पंजाबमध्ये होते. तेथेच त्यांना चव्हाण यांच्या राजीनाम्याचे वृत्त कळले. पंजाबमधील सभा आटोपल्यानंतर खर्गे दुपारी दिल्लीत परत आले.