वरिष्ठ भूवैज्ञानिक भूजल सर्वेक्षण विभागाची माहिती, विंधन विहिरींचा परिणाम
गुहागर | प्रतिनिधी : वरिष्ठ भूवैज्ञानिक भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणेने केलेल्या सर्व्हेमध्ये गेल्या पाच वर्षांच्या तुलनेत या वेळी रत्नागिरी जिल्ह्याची भूजल पातळी 0.07 मीटरने वाढलेली असली तरी या सर्व्हेमध्ये जिल्ह्यातील चार तालुक्यांमधील भूजलपातळी खालावलेली असल्याचा अहवाल या विभागाने जिल्हाधिकारी व जिल्हापरिषदेला दिला आहे. यामध्ये गुहागर, चिपळूण, दापोली, मंडणगड या तालुक्यांच्या भूजल पातळीत घट झाली आहे. राज्यात सर्वाधिक पाऊस रत्नागिरी जिल्ह्यात पडतो. जिल्ह्यात दरवर्षी सरासरी साडेतीन हजार मि.मी पावसाची नोंद होते. त्यामुळे जिल्ह्याची पाणीपातळी वाढणार, अशी सर्वांची धारणा असते; परंतु अतिवृष्टीचा तसा भूजलपातळीवर थेट परिणाम होत नाही. त्यासाठी रेनहार्वेस्टिंग किंवा पाणी अडवा-पाणी जिरवा हे अभियान राबवणे आवश्यक असते, तरच भूजल पातळीत वाढ होते.
वरिष्ठ भूवैज्ञानिक भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणेकडून दर 3 महिन्याला हा सर्व्हे होतो. त्यासाठी जिल्ह्यातील 63 विहिरी निश्चित केल्या आहेत. त्यांची पाणीपातळी मोजून त्यावर हा अंदाज बांधला जातो. गेल्या पाच वर्षांतील सप्टेंबरमधील सरासरी पाणीपातळी 3.01 मीटर होती. यामध्ये सर्वांत कमी मंडणगड तालुक्याची 0.97 मीटर पाणीपातळी होती तर सर्वांत जास्त लांजा तालुक्याची 5.62 मी. एवढी पाणीपातळी होती. त्यानंतर उर्वरित तालुक्याची या दरम्यान पाणीपातळी होती; परंतु सप्टेंबर 2024 मध्ये झालेल्या सर्व्हेमध्ये 2.94 मी. एवढी आहे. जिल्ह्यातील गुहागर 0.67 मी., मंडणगड 0.05 मी., दापोली 0.07 मी., चिपळूण 0.10 मी. या चार तालुक्यांमध्ये भूजल पातळी घटली आहे. उर्वरित खेड तालुक्यात 0.11 मी., संगमेश्वर 0.27 मी., रत्नागिरी 0.47 मी., लांजा 0.39 मी., राजापूर 0.33 मीटरने भूजलपातळी वाढली आहे. गेल्या काही वर्षांमध्ये बोअरवेल मारण्याचे प्रमाण अधिक आहे. जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात बोअरवेल मारल्या गेल्या आहेत. शासनाच्या निकषानुसार 200 फुटांपेक्षा जास्त खोलवर बोअरवेल मारता येत नाही; परंतु खासगी ठिकाणी मारल्या जाणार्या बोअरवेल वेळी या निकषाची पायमल्ली केली जाते. त्याचा परिणामही भूजल पातळीवर होत आहे.











