कोल्हापूर । प्रतिनिधी : गँगवॉरमधून राजेंद्रनगर येथील कुमार शाहूराज गायकवाड (वय २२) या तरुणाचा तीन ते चार हल्लेखोरांनी पाठलाग करून धारदार शस्त्रांनी वार करून निर्घृण खून केला. हा प्रकार रविवारी रात्री अकरा वाजण्याच्या सुमारास शहरातील डी वाय पी मॉल ते टाकाळा खण परिसरात घडला. खुनाच्या घटनेनंतर हल्लेखोर पसार झाले तर मृतांच्या नातेवाईकांसह राजेन्द् नगरातील शेकडो तरुणांनी सीपीआर च्या अपघात विभागासमोर गर्दी केल्याने तणाव वाढला होता.
घटनास्थळ आणि सीपीआर रुग्णालयातून मिळालेल्या माहितीनुसार कुमार गायकवाड हा राजेन्द् नगरातील त्याचा मामा त्र्यंबक गवळी याच्याकडे रहात होता. काही महिन्यांपूर्वी कुमार याचा राजेन्द् नगर परिसरातील एका टोळीतील तरुणांशी वाद झाला होता. त्यातून कुमार याच्यावर राजारामपुरी येथील पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता. याच वादातून विरोधी टोळीतील तरुणांची कुमारवर पाळत होती. रविवारी रात्री पावणे अकरा वाजण्याच्या सुमारास कुमार डीवायपी मॉलजवळ थांबला होता. काही वेळात तीन ते चार तरुण कुमारजवळ पोहोचले.
कुमार आणि त्या तरुणांमध्ये वाद सुरू होताच कुमारने पळ काढण्याचा प्रयत्न केला. उड्डाणपुलाकडून तो टाकाळा खणीच्या दिशेने पळत सुटला, त्याचवेळी तीन ते चार हल्लेखोरांनी कोयता आणि एडक्याने त्याच्यावर पाठलाग करून हल्ला चढवला.
जमिनीवर कोसळलेल्या कुमारच्या डोक्यात दगड घातला. तसेच डोक्यावर, चेहऱ्यावर, हातावर आणि छातीवर १८ ते २० वार केले. त्यानंतर हल्लेखोर पसार झाले. या घटनेमुळे कोल्हापूर शहरात एकच खळबळ उडाली आहे.