भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजना

31 डिसेंबरपर्यंत मुदत वाढली – दीपक घाटे

रत्नागिरी : सन २०२४-२५ या शैक्षणिक वर्षासाठी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजनेसाठी अर्ज करण्याची अंतिम मुदत 31 डिसेंबरपर्यंत वाढवण्यात आली आहे. तरी अनुसूचित जाती व नवबौध्द प्रवर्गातील जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी आपले अर्ज ऑनलाईनरीत्या नोंदणीकृत करून योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन समाज कल्याण विभागाचे सहाय्यक आयुक्त दीपक घाटे यांनी केले आहे.

१० वी नंतरच्या अभ्यासक्रमांना (११ वी, १२ वी) व १२ वी नंतरच्या व्यावसायिक तसेच बिगर व्यावसायिक अभ्यासक्रमांमध्ये प्रवेश मिळालेल्या अनुसूचित जाती व नवबौध्द विद्यार्थ्यांसाठी https://hmas.mahait.org या पोर्टलवर ऑनलाईन राबविण्यात येत असलेल्या भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजनेचे सन २०२४- २५ साठी अर्ज करण्यास दि. १६ डिसेंबरपर्यंत मुदत देण्यात आलेली होती.

विद्यार्थ्यांचे उशीरा सुरू होणारे शैक्षणिक सत्र,सद्यस्थितीत स्वाधार योजनेचा लाभ घेत असलेले विद्यार्थी, तसेच नव्याने स्वाधार योजनेसाठी अर्ज करणारे विद्यार्थी यांना ऑनलाईन अर्ज करताना तांत्रिक अडचणी येत आहेत. या बाबी विचारात घेऊन अनुसूचित जाती व नवबौध्द प्रवर्गातील विद्यार्थ्यांचे हित लक्षात घेता सन 2024-25 या वर्षासाठी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजनेसाठी अर्ज करण्याची मुदत दि.31 डिसेंबर 2024 पर्यंत वाढवण्यात आलेली आहे.