देवळे गावात रंगला पाच पालख्यांच्या भेटीचा सोहळा; भाविकांनी लुटला पालखी भेट सोहळ्याचा आनंद

देवरूख (प्रतिनिधी)संगमेश्वर तालुक्यातील देवळे येथे दरवर्षी शिमगा उत्सवातून पाच पालखी भेट सोहळा मोठ्या थाटामाटात साजरा केला जातो. यावर्षी मंगळवारी डोळ्यांचे पारणे फेडणारा हा पाच पालख्यांच्या भेटीचा सोहळा पार पडला. दाभोळे गावातील निनावी आणि भवानी देवींच्या दोन पालख्या मानकऱ्यांनी वाजत गाजत देवळेतील होळीच्या मांडावर आणल्या.

 

काही वेळातच मेघी गावचे गावकर गांगोबा देवाची पालखी ही वाजत गाजत फटाक्यांच्या आतिषबाजीत घेऊन आले. तसेच करंजारी गावातील वाघजाई धनीन देवीची पालखी ढोल ताशांच्या गजरात सामील झाली. देवळेची रवळनाथ कालेश्वरी देवीची पालखीही मांडावर आली आणि एकच जल्लोष, पाच गावातील ढोल ताशा पथकांनी ठेका धरला, गुलालाची उधळण आणि सुरू झाला पाच पालखी भेट सोहळा.

 

देवळे गावातील रवळनाथ कालेश्वरी देवीचे मानकरी शेट्ये-महाजन यांनी सर्व गावातील गावकऱ्यांना त्यांचे मानपान दिले. त्यानंतर पाच पालखी भेट सोहळा सुरु झाला. पाच पालख्यांं बरोबर आलेल्या ढोल वादकांच्या वादनाने भाविकांनी तालात पालखी नृत्य केलं. देवळे, करंजारी, दाभोळे, मेघी, जंगलवाडी, चाफवली गावातील भाविकांनी या पाच पालखी भेट सोहळ्याचा आनंद लुटला. हे दृश्य या होळी उत्सवातून प्रत्येकाच्या मनाला आनंद देणारे होते. तहान भुक हरपून सुमारे दोन ते अडीच तास पालखी नाचवण्याचा आनंद लुटला. हा सोहळा डोळ्यांचे पारणे फेडणारा होता.

 

हा सोहळा पाहण्यासाठी फार दुरवरुन भाविक गर्दी करतात. गुलालाची उधळण केली जाते. चतुर्सीमा तसेच देवळेतील सर्व मानकरी, गावकरी, ग्रामस्थ हा सोहळा पार पाडण्यासाठी खुप मेहनत घेतात. डोळ्यांचे पारणे फेडणारा हा सोहळा आलेल्या भाविकांनी याची डोळा पाहिला आणि धन्य झालो असे म्हणत कोकणी माणूस शिमग्याला का गावात येतो हे इथे आल्याशिवाय कळणार नाही असेच म्हणत होता. या कार्यक्रमात आमदार किरण उर्फ भैय्या सामंत यांनी भेट दिली आणि सर्व देवतांचे आशिर्वाद घेतले. पालखी भेट सोहळ्यात सुमारे 67 वर्षाच्या लक्ष्मी देवळेकर -(कशेळी खवटी ) यांच्या लाठी-काठी प्रात्यक्षिकाने सर्वांचे लक्ष वेधून घेतले. यानंतर गावातील ग्रामस्थांनी आलेल्या सर्व भाविकांसाठी महाप्रसादाचे आयोजन केले होते. दर वर्षी कोणी ना कोणी भक्त महाप्रसादाचा खर्च करत असतो या वर्षी विशाल विजय काळोखे यांनी महाप्रसादाचा खर्च केला. मोठ्या संख्येने भाविकांनी महाप्रसादाचा लाभ घेतला.