सुट्टीच्या दिवशीही सुरू राहणार वीजबिल भरणा केंद्रे

रत्नागिरी/सिंधुदुर्ग : महावितरणच्या कोकण परिमंडल, रत्नागिरी अंतर्गत महावितरणला पुढील ३१ मार्च अखेर २३ कोटी ७० लाख वसूल करायचे आहेत. त्यासाठी महावितरणने मोहीम तीव्र केली असून वसुलीसाठी वीजपुरवठा खंडित करण्याचे आदेश कर्मचाऱ्यांना देण्यात आले आहेत.

 

३१ मार्च अखेर सर्व सुट्टीच्या दिवशी ही वीजबिल भरणा केंद्र सुरू राहणार आहेत. त्यामुळे वीज ग्राहकांनी चालू तसेच थकीत वीजबिल भरावे आणि आपली गैरसोय टाळावी, असे आवाहन महावितरणने केले आहे.

 

चालू आर्थिक वर्षाचे केवळ ०९ दिवस शिल्लक आहे. कोकण परिमंडल रत्नागिरी अंतर्गत प्रत्येक दिवसाला ०२ कोटी ६३ लाख वसूल करायचे आहे. वसुलीसाठी कर्मचारीच नाही तर मुख्य अभियंता अनिल डोये यांच्यासह रत्नागिरी मंडल कार्यालयाचे अधीक्षक अभियंता वैभवकुमार पाथोडे, सिंधुदुर्ग मंडल कार्यालयाचे अधीक्षक अभियंता अशोक साळुंखे यांच्यासह सर्व कार्यकारी अभियंते आपल्या संपूर्ण टीमसह वसुली मोहिमेत सहभागी झाले आहेत.