खेडच्या खोपी गावातील ४ घरे वणव्यात जळून खाक

धान्य, भांडी, कपडे आगीच्या भक्ष्य स्थानी, ४ कुटुंब वाऱ्यावर 

खेड(प्रतिनिधी)खेड तालुक्यातील खोपी गावातील (जाभेलवाडी) डोंगराच्या पायथ्याशी वसलेली धनगर समाज बांधवांची ४ घरे शनिवारी वणव्यात जळून खाक झाली. वाडीत पाणी व रस्ता नसल्याने काही कुटूंबे उन्हाळ्यात पाण्याच्या जवळ स्थलांतरित झाली आहेत. त्यामुळे आग लागली तेव्हा घरांमध्ये कोणीही नसल्याने मोठा अनर्थ टळला.मात्र या आगीत चार कुटुंबाचे जीवनावश्यक वस्तू आगीच्या भक्ष्यस्थानी पडल्या

 

 

वणव्याने लागलेल्या आगीत पार्वती बबन ढेबे, रंजना लक्ष्मण ढेबे, लक्ष्मी जानू ढेबे, मोहन जानू ढेबे यांची घरे जळून खाक झाल्याने लाखो रूपयांचे नुकसान झाले आहे. घरातील धान्य, भांडी व कपडे जळून खाक झाल्याने चार कुटुंबे बेघर झाली आहेत.

 

शासनाच्या मदतीची मागणी

 

खोपी येथे धनगर बांधवांची घरे जुळून मोठे नुकसान झाले आहे. या घटनेची दखल घेऊन सरकारने त्यांचे संसार पुन्हा उभे करण्यासाठी सहकार्य करावे, अशी मागणी महाराणी अहिल्यादेवी समाज प्रबोधन मंच रत्नागिरीचे अध्यक्ष रामचंद्र आखाडे यांनी केली आहे.