रत्नागिरी : येथील भारत शिक्षण मंडळाच्या बियाणी बालमंदिर व भिडे आजी खेळघरात शाळा प्रवेशोत्सव सोहळा साजरा झाला.
भारत शिक्षण मंडळाचे अध्यक्ष नंदकुमार साळवी, उपाध्यक्ष श्रीराम भावे, खजिनदार सीए नचिकेत जोशी, बाल विभागाचे अध्यक्ष दादा कदम व प्राथमिक शाळा समितीचे अध्यक्ष डॉ. चंद्रशेखर केळकर, प्रबंधक विनायक हातखंबकर, ज्येष्ठ सदस्य चंद्रकांत घवाळी, सदस्य संतोष कुष्टे, मुख्याध्यापिका धनश्री मुसळे, शिक्षक, पालक यांनी विद्यार्थ्यांचे स्वागत केले. आकर्षक वेशभूषा करून आलेले बालवाडीच्या विद्यार्थ्यांचे औक्षण करून स्वागत केले. ढोल ताशांच्या गजरात विद्यार्थ्यांवर पुष्पवृष्टी करण्यात आली. त्यांना वाजत गाजत त्यांच्या वर्ग खोल्यापर्यंत नेण्यात आले. संस्थेचे अध्यक्ष साळवी यांनी विद्यार्थी व पालकांचे स्वागत केले व त्यांना शुभेच्छा दिल्या. मुख्याध्यापिका मुसळे यांनी प्रास्ताविक केले. प्रबंधक हातखंबकर यांनी संस्थेने दिलेल्या नूतन वास्तूमध्ये हा वर्गप्रवेश होत असल्याबद्दल आनंद व्यक्त केला.












