देशभक्तीपर घोषणांनी मालवण नगरी दणाणली
मालवण | प्रतिनिधी : भारत माता की जय… वंदे मातरम… छत्रपती शिवाजी महाराज की जय… अखंड भारत… समर्थ भारत अशा घोषणा देत भारतीय तिरंगा फडकवत मालवणमध्ये अखंड भारताचे स्मरण व भारतीय स्वातंत्र्य दिनाचे स्वागत या अनुषंगाने देशप्रेमी नागरिकांच्या सहभागातून मोटरसायकलद्वारे भव्य तिरंगा सन्मान रॅली काढण्यात आली.
मालवण भरड नाका येथे रॅलीचे संयोजक भाऊ सामंत यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून तिरंगा रॅलीला प्रारंभ झाला. भरड नाका येथून बाजारपेठ मार्गे फोवकांडा पिंपळपार ते पुन्हा भरड नाका येथून देऊळवाडा मार्गे कुंभारमाठ येथील हुतात्मा प्रभाकर रेगे स्मारकापर्यंत ही रॅली काढण्यात आली. या रॅलीत मोटरसायकलवर स्वार होऊन आणि तिरंगा फडकवत नागरिक, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, विश्व हिंदू परिषद, बजरंग दल, सनातन, लायन्स क्लब यांसह पक्ष पदाधिकारी, विविध संघटनांचे कार्यकर्ते सहभागी झाले होते.
कुंभारमाठ येथील हुतात्मा रेगे स्मारकाच्या ठिकाणी रॅलीची सांगता झाल्यावर स्मारकाला पुष्प अर्पण करण्यात आले तसेच देश स्वातंत्र्यासाठी बलिदान देणाऱ्या हुतात्म्यांना व देशाच्या फाळणीवेळी मृत्युमुखी पडलेल्या नागरिकांना श्रद्धांजली वाहण्यात आली. जोरदार देशभक्तीपर घोषणा देण्यात आल्या. यावेळी भाऊ सामंत म्हणाले दरवर्षी ही रॅली काढली जाणार असून नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, अखंड भारतासाठी संघटित होत राहावे, असे आवाहन केले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सूचनेनुसार देशभर हिंदुत्ववादी संघटनांकडून तिरंगा रॅली काढण्यात येत आहेत. अखंड भारत ही संकल्पना सत्यात उतरावी, यासाठी नागरिकांनी संघटित होण्यासाठी व देशाच्या स्वातंत्र्यासाठी बलिदान देणाऱ्या हुतात्म्यांचे स्मरण व्हावे यासाठी ही रॅली काढण्यात येत आहे, असे बाबा मोंडकर म्हणाले.
यावेळी विलास हडकर म्हणाले, १४ ऑगस्ट हा देशाच्या फाळणीच्या शोकांतिकेचा काळा दिवस आहे. तोडा फोडा राज्य करा या विचाराने आपल्यावर राज्य केलेले इंग्रज जाताना देखील देशाची फाळणी करून गेले. यामध्ये अनेक नागरिक व स्त्रिया यांच्यावर अत्याचार झाले. हे आपण विसरता कामा नये. भुटान, अफगाणिस्तान, नेपाळ, पाकिस्तान, बांगलादेश, श्रीलंका, म्यानमार अशा अनेक भुभागांनी जोडलेल्या भारताचे तुकडे केले गेले. त्यामुळे अराजकीय व नैसर्गिकरित्या सुरक्षित असा अखंड भारत पुन्हा साकारणे हे आपले स्वप्न आणि निष्ठा आहे, यासाठी नागरिकांना संघटित करण्याच्या दृष्टीने तिरंगा रॅली महत्वाची आहे, असेही हडकर म्हणाले.
यावेळी अशोक सावंत, भाऊ सामंत, विलास हडकर, बाबा मोंडकर, राजन वराडकर, दीपक पाटकर, गणेश कुशे, मंदार केणी, अन्वेषा आचरेकर, आबा हडकर, भालचंद्र राऊत, महेश सारंग, राजू बिडये, परशुराम पाटकर, बबन परुळेकर, सन्मेष परब, आप्पा लुडबे, अनिकेत फाटक, ललित चव्हाण, श्रीराज बादेकर, भाई कासवकर, मनोज मेथर, संदीप बोडवे, मिलिंद झाड, महेश मेस्त्री, दादा वाघ, जीवन भोगावकर, राजू आंबेरकर, गणेश चव्हाण, रवींद्र खानविलकर, यतीन मालवणकर, हरेश फडते, शाम झाड, मोहन कुबल, सुशांत तायशेटे, रत्नाकर कोळंबकर, राजू बिडये, मंदार झाड, पंकज पेडणेकर, पूजा करलकर, वैष्णवी मोंडकर, महिमा मयेकर, राणी पराडकर, दिव्या कोचरेकर, शुभदा टीकम, अनुष्का चव्हाण, पूनम चव्हाण, नंदिनी गांवकर यांसह अन्य नागरिक सहभागी झाले होते.










