जिल्ह्यातील प्रमुख राष्ट्रीय व राज्य मार्ग सुरळीत

दख्खन, अणुस्कुरा घाटातील दरड हटवली
*रत्नागिरी, दि. 19 : राष्ट्रीय महामार्ग क्र.166, मौजे दख्खन गावी कोसळलेली दरड रवी इन्फ्रा कंपनीमार्फत जेसीबी, पोकलेनने तसेच अणुस्कुरा घाटातील दरड सार्वजनिक बांधकाम विभागाने काढल्याने अणुस्कुरा – मलकापुर मार्ग सुरु करण्यात आला आहे. वाटुळ मांडवकरवाडी, सौंदळ फुपेरे, आंगले रस्ता प्रमुख जिल्हा मार्गावरील पाण्याची पातळी कमी झाल्याने तो वाहतुकीसाठी खुला करण्यात आला आहे, अशी माहिती जिल्हा आपत्ती व्यवस्थापन कक्षाकडून दुपारी 12 वाजता देण्यात आली आहे.*
   खेड तालुक्यातील जगबुडी धोका पातळीच्यावर असून, चिपळूणमधील वाशिष्ठी, संगमेश्वरमधील शास्त्री, लांजामधील काजळी, राजापूर मंधील कोदवली आणि संगमेश्वरमधील बावनदी इशारा पातळीच्या वर आहेत. चिपळूणमधील कळंबस्ते गावामध्ये सखल भागात पाणी आल्याने 5 कुटुंबांचे तात्पुरते स्थलांतर केले आहे. जुवाड बेटावरील नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवले आहे. चांदेराई पुल येथील काजळी नदीचे पाणी ओसरले आहे. परंतु, चांदेराई व हरचिरी मध्ये रस्त्यावर पाणी असल्याने गावातून वाहतूक बंद आहे. पुलावरील वाहतूक कुर्तेडेमार्गे सुरु आहे.