खेड (प्रतिनिधी) :
दिवाळी सण हा आनंद, एकोपा आणि आपुलकीचा प्रतीक मानला जातो. याच भावनेला साजेसं उदाहरण उभं करत दुबई येथील सुप्रसिद्ध उद्योजक आणि मूळचे खेड तालुक्यातील असलेले बशीर भाई हजवानी यांनी हिंदू-मुस्लिम ऐक्याचा सुंदर संदेश दिला आहे. दिवाळी सणानिमित्त त्यांनी पंचक्रोशीतील सुमारे सोळाशे महिलांचा “भाऊबीज” म्हणून सन्मान करत त्यांना भेटवस्तू देऊन अनोखी परंपरा जोपासली.
हा छोटेखानी पण अर्थपूर्ण कार्यक्रम रत्नागिरी जिल्ह्यातील खेड तालुक्यातील उधळे येथे सोमवार, दिनांक २० ऑक्टोबर रोजी मोठ्या उत्साहात पार पडला. या कार्यक्रमासाठी परिसरातील महिला, नागरिक आणि मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते. या कार्यक्रमात बशीर भाई हजवानी यांनी आपल्या भावनिक शब्दांत सांगितले की, “धर्म वेगळे असले तरी आपली माणुसकी एकच आहे. दिवाळी असो वा ईद, आनंदाचा प्रत्येक क्षण आपण सर्वांनी एकत्र साजरा केला पाहिजे. हाच खरी ‘भारत’ संस्कृतीचा संदेश आहे.”
महिलांनीही या उपक्रमाचे मनःपूर्वक स्वागत केले. बशीर भाईंच्या या उपक्रमामुळे परिसरात ऐक्य, सौहार्द आणि बंधुतेचा संदेश पसरला असून समाजात सद्भावनेचा आदर्श निर्माण झाला आहे. उधळे परिसरात गेल्या काही वर्षांपासून बशीर भाई हजवानी हे विविध सामाजिक उपक्रमांतून कार्यरत असून त्यांचे हे कार्य समाजात प्रेरणादायी ठरत आहे.











