आगामी पाच वर्षांचा कालावधी सावंतवाडीकरांसाठी समर्पित : बबन साळगावकर

वचननाम्यात दिलेली काम पूर्ण करण्याची आमची सामुदायिक जबाबदारी 

भाजपच्या विजयानंतर जानेवारीत पर्यटन महोत्सव 

सावंतवाडी । प्रतिनिधी : भाजपच्यावतीने ही निवडणूक आम्ही विकासात्मक मुद्दे घेऊन लढत आहोत. सेंट्रलाईज अंडरग्राऊंड ड्रेनेज सिस्टीम प्रोजेक्ट आम्ही करणार आहोत. तसेच मंजूरी होऊनही रखडलेलं शिरशिंगे धरण पूर्णत्वास आणण्यासाठी पालकमंत्री नितेश राणे यांच्याशी चर्चा झालीय‌‌. येणारा ५ वर्षांचा कालावधी जनतेसाठी समर्पीत करत असून दिलेलं वचन पूर्ण करण्याची जबाबदारी आमची राहील, असे मत माजी नगराध्यक्ष तथा भाजपचे नगरसेवक पदासाठीचे उमेदवार बबन साळगावकर यांनी व्यक्त केले. सावंतवाडी येथे आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

ते म्हणाले, तत्कालीन मंत्री रविंद्र चव्हाण यांच्या माध्यमातून ६४ कोटींची नळपाणी योजना मंजुर झाली आहे‌. ते काम सुरू आहे. घनकचरा व्यवस्थापनाचा प्रकल्प आम्ही केला. मात्र, नंतर तिथे लक्ष दिलं गेलं नाही. मात्र, आम्ही आदर्शवत असा प्रकल्प उभारून दाखवू. रिंगरोडचा प्रस्ताव मुख्यमंत्र्यांना सादर करणार आहोत. विकासात्मक मुद्यावर आम्ही निवडून लढत असून वचननामा घेऊन आम्ही जात आहोत. ही आश्वासने पूर्ण करण्याची जबाबदारी माझी अन् नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार युवराज्ञी श्रद्धाराजे भोंसले यांची राहणार आहे असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

तसेच मी कोणावर टीका करणार नाही. अंडरग्राऊंड वीज वाहिन्यांसाठी खोदलेले रस्ते बुजवण्यासाठी पैसे न दिल्यानं तो प्रकल्प पूर्ण होऊ शकला नाही. युवराज्ञी उत्कृष्ट आणि काम करणाऱ्या आहेत. घराघरात त्यांच स्वागत होत आहे. त्यांचा विजय निश्चितच होईल. तर मल्टीस्पेशालिटीसाठी प्रकल्प कोणी आणला त्यांच्याकडूनच उत्तर घ्यावीत‌ अस विधान त्यांनी यासंदर्भातील प्रश्नवार केल. तसेच भारतीय जनता पार्टीच्या विजयानंतर जानेवारीत सावंतवाडी पर्यटन महोत्सव घेणार असल्याची माहितीही त्यांनी यावेळी दिली.

यावेळी भाजपच्या प्रभाग क्रमांक दोनच्या उमेदवार सुनिता पेडणेकर, भाजपचे ज्येष्ठ नेते दादू कविटकर आदी उपस्थित होते.