ओणी – अनुस्कुरा मार्गांवरील खड्यांमुळे दुहेरी संकटाचा प्रवाशांना त्रास

राजापूर (वार्ताहर): तालुक्यातील ओणी – अनुस्कुरा मार्गांवर काही परिसरातील पडलेले खड्डे बुझविण्यात आले असले तरी रायपाटण पासून ओणी पर्यंत पडलेले खड्डे बुझविण्याचे काम अद्याप सुरु न झाल्याने संबंधित सार्वजनिक बांधकाम विभाग मुहूर्त शोधतोय काय अशी खोचक विचारणार आता जनमानसातून होऊ लागली आहे. दिवसेंगणिक पडलेले खड्डे अधिकच रुंदावत असून खड्ड्याचा त्रास आणि उसळणारी धुळी अशा दुहेरी संकटाचा सामना वाहनचालकांसह प्रवाशांना करावा लागत आहे.
ओणी – अनुस्कुरा मार्गांवरील पडलेले खड्डे तात्काळ बुजवण्यात यावे. अशी मागणी करणारे निवेदन काही दिवसापूर्वी पूर्व परिसरातील ग्रामस्थांच्या वतीने सार्वजनिक बांधकाम विभागाला देण्यात आले होते. मात्र अनुस्कुरा घाटापासून पाचल पर्यंत पडलेले खड्डे बुजविण्यात आले त्यानंतर रायपाटण पासून ओणी पर्यंत पडलेले खड्डे तसेच असून ते बुझविण्याचे काम अद्याप सुरुझालेले नाही हे वास्तव पुढे आले आहे. या संपूर्ण मार्गांवर रायपाटण पासून ओणी पर्यंतच्या मार्गांवर मोठया प्रमाणावर खड्डे पडले असून यामध्ये रायपाटण, विरभद्र मंदिरापासून येळवण थांबा, कोळवणखडी घाटी पासून पेट्रोलपंप (कोळवणखडी )कोळवण खडी थांब्यापासून पुढील काही भाग.. सौन्दल हायस्कुल पासून पाटिलवाडी रेल्वेस्थानक पर्यंतचा परीसर, दैतवाडी चा परीसर या परीसरात तर खड्ड्याचे साम्राज्य पसरले आहे.
सुरवातीला रस्त्यात खड्डे पडले होते आता तर पडलेले खड्डे पाहता खड्ड्यात रस्ता गेला असे म्हणण्याची वेळी प्रवाशांसह वाहन चालकांवर आली आहे. मार्गांवर मोठया प्रमाणात खड्डे पडले असताना त्यातून वाहन चालवीताना कसरत करावी लागत असतानाच उसळणाऱ्या धुळीमुळे तर आणखी त्रास होत आहे. त्यामुळे पूर्व परीसरातून प्रवास करताना अडचणीचा सामना करावा लागत आहे.
संपूर्ण मार्ग खड्डेमय बनला असताना पडलेले खड्डे नेमके कोणत्या मुहूर्तावर बुझविले जाणार आहेत असे सवाल आता उपस्थित होत आहेत.यापूर्वी संबंधित विभागाला निवेदन देवून तात्काळ खड्डे बुझविण्याची मागणी करण्यात आली होती. आंदोलनाचा इशारा देखील देण्यात आला होता. पण अद्याप कार्यवाही काहीच झालेली नाही. मात्र त्याचा त्रास प्रवाशांसह वाहनचालकांना होत आहे.