नवी दिल्ली : बंगळुरू येथे झालेल्या बैठकीत देशातील विरोधी पक्षांच्या आघाडीला ‘INDIA’ हे नवे नाव देण्यात आले. काँग्रेस नेते राहुल गांधी यांनीच विरोधी पक्षांच्या आघाडीला हे नाव सुचवले होते. मात्र, विरोधी पक्षातील काही नेत्यांना हे नाव फारसे पटल्याचे (confusion) दिसत नाही. त्यांच्यात आता धुसफूस सुरू झाली आहे. काही मोठ्या पक्षांनी नावात बदल करण्यासह काही नवीन शब्द जोडण्याचा पर्याय दिल्याचे समजते. यामध्ये बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांचा जेडीयू आणि लालू प्रसाद यादव यांच्या नेतृत्वातील आरजेडी प्रमुख आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, विरोधी पक्षातील एका नेत्याने सांगितले की INDIA या नावासह आणखी काहीतरी शब्द जोडला गेला पाहिजे. प्रत्येक राज्यात नाव वेगळे असू शकते. बंगालमध्ये इंडिया मोर्चा, तामिळनाडूत इंडिया अलायन्स अशी नावे असू शकतील. त्यामुळे नागरिकांचेही आकलन होण्यास सोपे होईल आणि काही गोंधळही राहणार नाही.
पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी नावाचा प्रस्ताव विरोधी पक्षांसमोर ठेवला तेव्हा नितीश कुमार आणि डाव्या पक्षांचे नेते सिताराम येचुरी यांना या नावावर सहमती देणे शक्य होत नव्हते, असेही त्यांनी सांगितले.
बंगळुरू येथील बैठकीत आरजेडी, जेडीयू यांच्या व्यतिरिक्त डीएकेचे तिरुची सिवा आणि टीआर बालू, तृणमूल काँग्रेसचे डेरेक ओ ब्रायन, आम आदमी पार्टीचे खासदार संजय सिंह, काँग्रेसचे गौरव गोगोई, रजनी पाटील, प्रमोद तिवारी, मणिकम टागोर, राष्ट्रवादी काँग्रेसच्या वंदना चव्हाण तसेच झारखंड मुक्ती मोर्चा, सीपीआय सहीत अनेक पक्ष सहभागी झाले होते.












