आक्रमक किंमत धोरणाला पूर्णविराम
भारतात प्रीमियम, विश्वास आणि इकोसिस्टमवर फोकस
एकेकाळी आक्रमक किमतींमुळे भारतीय स्मार्टफोन बाजार ढवळून काढणारी Xiaomi India आता वेगळ्याच टप्प्यावर पोहोचली आहे. कंपनीने मोठ्या प्रमाणावर विक्रीच्या शर्यतीतून माघार घेत विश्वास पुनर्संचयित करण्यावर भर दिला आहे. प्रीमियम ब्रँड म्हणून स्वतःची ओळख निर्माण करण्याचा Xiaomi चा प्रयत्न आहे. 2026 हे वर्ष कंपनीसाठी ‘रिसेट’ ठरणार असल्याचे स्पष्ट संकेत मिळत आहेत. भारतीय ग्राहकांच्या बदलत्या गरजांनुसार दीर्घकालीन मूल्य देण्यावर Xiaomi लक्ष केंद्रित करत आहे.
नवी दिल्ली : ज्या कंपनीने एकेकाळी भारताच्या स्मार्टफोन मार्केटमध्ये निर्दयी किमतींच्या धोरणाने क्रांती घडवली, तीच Xiaomi India आता एका वेगळ्याच लढाईत उतरली आहे. आता कोणत्याही किंमतीत मोठ्या प्रमाणावर विक्री करण्यापेक्षा विश्वास, प्रीमियम ओळख आणि परिपक्व ब्रँड प्रतिमा निर्माण करण्यावर कंपनीचा भर आहे. नियामक छाननी, किमतींवरील दबाव आणि विक्रीतील मंदी अशा अडचणींनंतर 2026 हे वर्ष Xiaomi साठी नव्या सुरुवातीचे मानले जात आहे.
याचे उदाहरण म्हणजे वर्षातील पहिली दोन उत्पादने Redmi Note 15 आणि Pad 2 Pro यांचे लाँच. Xiaomi ग्रुपचे वरिष्ठ उपाध्यक्ष ॲडम झेंग यांनी भारताला 2026 मधील पहिली परदेशी भेट देताना सांगितले की, भारत ही Xiaomi साठी अत्यंत महत्त्वाची बाजारपेठ आहे. “Xiaomi ही आता केवळ उत्पादन कंपनी राहिलेली नाही. आम्ही मानव, कार आणि घरासाठी संपूर्ण इकोसिस्टम उभारणारी AI प्लॅटफॉर्म कंपनी आहोत,” असे त्यांनी स्पष्ट केले.
भारतातील स्मार्टफोन ग्राहक आता फक्त स्वस्त फोन शोधत नाहीत. त्यांना दीर्घायुष्य, सॉफ्टवेअर अपडेट्स, दर्जेदार सेवा आणि संपूर्ण डिजिटल अनुभव हवा आहे. यासाठी Xiaomi ने प्रामाणिक किंमत धोरण, सखोल स्थानिकीकरण आणि विस्तृत उत्पादन इकोसिस्टम यांचा मार्ग स्वीकारला आहे. Xiaomi ग्लोबलचे उपाध्यक्ष अल्विन त्से यांनी मान्य केले की गेली काही वर्षे ब्रँडसाठी कठीण गेली, मात्र भारतीय बाजारपेठेवरील विश्वास कायम आहे.
Xiaomi India चे CEO सुधीन माथूर यांच्या मते, ग्राहक आता फोन 3 ते 4 वर्षे वापरत आहेत. त्यामुळे कंपनीने दीर्घकालीन सॉफ्टवेअर आणि सुरक्षा अपडेट्स देण्याचा निर्णय घेतला आहे. देशभरात 1,500 हून अधिक सेवा केंद्रे असलेल्या Xiaomi कडून पुढील दीड वर्षात 100 प्रीमियम सर्व्हिस हब सुरू करण्यात येणार आहेत. तसेच, ऑनलाइनपुरते मर्यादित न राहता मॉल्स आणि संघटित रिटेलमध्ये उपस्थिती वाढवली जात आहे.
स्थानिकीकरण हा Xiaomi चा मोठा मजबूत मुद्दा ठरत आहे. 2017 मध्ये फक्त 5 टक्के स्थानिक घटक असलेली Xiaomi आज 35 टक्क्यांपर्यंत स्थानिक सोर्सिंग करत आहे. भारतात विकले जाणारे 100 टक्के फोन आणि टीव्ही ‘मेड इन इंडिया’ आहेत. वेअरेबल्स आणि टॅब्लेट्सही आता भारतात तयार होत आहेत. Xiaomi भारताला केवळ विक्री बाजारपेठ न मानता उत्पादन आणि चाचणी केंद्र म्हणून विकसित करत आहे.
Xiaomi आता स्वतःला फक्त स्मार्टफोन ब्रँड म्हणून मांडत नाही. जगातील सर्वात मोठ्या AIoT इकोसिस्टमपैकी एक Xiaomi कडे असून, भारतात १४ कोटींहून अधिक सक्रिय वापरकर्ते आहेत. Xiaomi India च्या एकूण महसुलातील 15 ते 18 टक्के हिस्सा आता नॉन-स्मार्टफोन उत्पादनांमधून येतो. टॅब्लेट, वेअरेबल्स, टीव्ही आणि पॉवर बँक्स या श्रेणींमध्ये कंपनी वेगाने वाढ करत आहे.
2026 मध्ये Xiaomi मिड-प्रिमियम सेगमेंटवर विशेष लक्ष केंद्रित करणार आहे. रोबोट व्हॅक्यूम क्लीनर, एअर प्युरिफायर यांसारखी उत्पादने पुन्हा सादर केली जातील. Xiaomi च्या मते, 2026 हे वर्ष फोनपुरते मर्यादित नसून संपूर्ण इकोसिस्टमसाठी निर्णायक ठरणार आहे. स्वस्त ब्रँडची प्रतिमा मागे टाकून विश्वासार्ह, प्रीमियम आणि दीर्घकालीन मूल्य देणारा ब्रँड म्हणून Xiaomi स्वतःला पुन्हा उभे करण्याचा प्रयत्न करत आहे.
हा बदल ग्राहक कितपत स्वीकारतात, यावर Xiaomi च्या खऱ्या पुनरागमनाचे यश अवलंबून असेल. मात्र कंपनीच्या नेतृत्वाकडून मिळणारे संकेत पाहता, भारतासाठी Xiaomi पूर्ण ताकदीने मैदानात उतरल्याचे स्पष्ट होते.











