अपघाताच्या कारणांवर प्रश्न, कागदपत्रे न जळल्याने शंका
नागरी उड्डाण मंत्रालयाचा दावा – खराब दृश्यमानतेमुळे दुर्घटना
बारामती हवाई पट्टीजवळ झालेल्या भीषण विमान अपघातानंतर आता या घटनेभोवती संशयाचे ढग दाटू लागले आहेत. माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह पाच जणांच्या मृत्यूने राज्य हादरले असतानाच विरोधकांनी आणि सत्ताधारी पक्षातील काही नेत्यांनीही प्रश्न उपस्थित केले आहेत. अपघातानंतर आगीच्या घटनेनंतरही काही कागदपत्रे सुरक्षित सापडल्याने शंका व्यक्त केली जात आहे. विरोधी पक्षांकडून स्वतंत्र चौकशीची मागणी जोर धरू लागली आहे. मात्र नागरी उड्डाण मंत्रालयाने प्रथमदर्शनी खराब दृश्यमानता हेच अपघाताचे कारण असल्याचे स्पष्ट केले आहे.
पुणे : बारामती हवाई पट्टीजवळ 28 जानेवारी रोजी झालेल्या विमान अपघातात माजी उपमुख्यमंत्री अजित पवार आणि इतर चार जणांचा मृत्यू झाला होता. या अपघाताबाबत सोमवारी विरोधकांसह राष्ट्रवादी काँग्रेसच्या काही सदस्यांनी संशय व्यक्त केला आहे. दरम्यान, नागरी उड्डाण मंत्रालयाने या दुर्घटनेचे प्रथमदर्शनी कारण खराब दृश्यमानता असल्याचे सांगितले आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसचे एमएलसी अमोल मिटकरी यांनी एक्स (माजी ट्विटर) वरील पोस्टमधून या अपघातावर थेट प्रश्न उपस्थित केले. नंतर पत्रकारांशी बोलताना त्यांनी सांगितले की, अपघातानंतर विमानाला आग लागली असतानाही घटनास्थळी सापडलेली काही कागदपत्रे जळली नाहीत. प्राथमिक अहवालात सहा प्रवासी असल्याचा उल्लेख असताना फक्त पाच मृतदेह सापडले, ही बाब संशयास्पद असल्याचे त्यांनी नमूद केले. तसेच Learjet-45 विमानाचा पूर्वीही अपघाताचा इतिहास असल्याचा दावा त्यांनी केला.
मिटकरी यांच्या या पोस्टचा संदर्भ देत काँग्रेसचे आमदार विजय वडेट्टीवार यांनीही या अपघातात काहीतरी गडबड असल्याचा आरोप केला. सरकारने संपूर्ण माहिती जनतेसमोर मांडावी, अशी मागणी त्यांनी केली. दरम्यान, कॅबिनेट मंत्री आणि राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांनीही तांत्रिक बिघाडामुळे अपघात झाला का? असा सवाल उपस्थित केला.
येवला येथे झालेल्या शोकसभेत बोलताना भुजबळ म्हणाले की, सीसीटीव्ही फुटेजमध्ये विमान अचानक कोसळताना दिसत आहे. इंजिन किंवा रडारमध्ये बिघाड असण्याची शक्यता अनेक तज्ज्ञांनी व्यक्त केल्याचेही त्यांनी सांगितले. मात्र, चौकशी सुरू असून अंतिम निष्कर्ष तपासानंतरच स्पष्ट होईल, असेही त्यांनी नमूद केले.
या पार्श्वभूमीवर विरोधी पक्षाने स्वतंत्र चौकशीची मागणी केली आहे. शिवसेना (यूबीटी) चे राज्यसभा खासदार संजय राऊत यांनी संसदेत हा मुद्दा उपस्थित करत सांगितले की, महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर अजित पवार यांनी भाजप सदस्यांच्या भ्रष्टाचाराचे पुरावे असल्याचा दावा केला होता. त्यानंतर काही दिवसांतच विमान अपघात झाल्याने संशय निर्माण होत आहे, असे ते म्हणाले. मात्र त्यांनी थेट आरोप न करता स्वतंत्र आणि सखोल चौकशीची मागणी केली.
दरम्यान, नागरी विमान वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी विरोधकांवर तीव्र टीका करत या शोकांतिकेचे राजकारण करू नये, असे म्हटले. नवी दिल्लीत पत्रकारांशी बोलताना त्यांनी सांगितले की, DGCA आणि AAIB या यंत्रणा या अपघाताची सखोल चौकशी करत आहेत. ब्लॅक बॉक्स जप्त करण्यात आला असून लवकरच तपशीलवार अहवाल सादर केला जाईल, अशी माहिती त्यांनी दिली.












