कणकवलीत मच्छिंद्र कांबळी नाट्य महोत्सवाचा शुभारंभ…!
कणकवली – विकासाची आपण सातत्याने चर्चा करतो. मात्र विकासाच्या व्याख्येत जर संस्कृतीचा समावेश झाला असता, तर सिंधुदुर्ग जिल्हा राज्यात अग्रेसर ठरला असता, असे मत जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांनी व्यक्त केले. जीवनाच्या प्रवासात प्रत्येक जण गरजा पूर्ण करण्यासाठी धडपडत असतो; पण जीवनाचा खरा आनंद घेण्यासाठी कलेची अभिरुची आवश्यक आहे. कलेची आवड असणे हे माणूसपणाचे खरे लक्षण आहे, असे त्यांनी ठामपणे सांगितले.
वसंतराव आचरेकर सांस्कृतिक प्रतिष्ठानतर्फे आयोजित मच्छींद्र कांबळी नाट्यमहोत्सवाचे उद्घाटन प्रतिष्ठानच्या नाट्यगृहात जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांच्या हस्ते झाले. उद्घाटनप्रसंगी त्या बोलत होत्या.
यावेळी माजी आमदार प्रमोद जठार, उद्योजक सुनील पाटील, ज्येष्ठ पत्रकार अशोक करंबेळकर, मंगेश यादव, कार्यवाह अॅड. एन. आर. देसाई, विश्वस्त दामोदर खानोलकर, डॉ. समीर नवरे, राजा राजाध्यक्ष, लीना काळसेकर, सीमा कोरगावकर, प्रसन्ना देसाई, मिलिंद बेळेकर आदी मान्यवर उपस्थित होते.
जिल्हाधिकारी धोडमिसे म्हणाल्या, “मी अधिकारी असले तरी सर्वप्रथम माणूस आहे आणि एक कलाकार आहे. कलेबद्दल मला नितांत आदर आहे. सिंधुदुर्ग व राज्याच्या सांस्कृतिक चळवळीत वसंतराव आचरेकर सांस्कृतिक प्रतिष्ठानचे योगदान मोलाचे आहे. प्रतिष्ठानच्या नाट्यगृहात दरवर्षी नाटके व एकांकिका सादर होतात, ही बाब अत्यंत कौतुकास्पद आहे.”
सिंधुदुर्गात विविध ठिकाणी नाट्यप्रयोग व लोककलेचे सादरीकरण होत असल्याचा आनंद व्यक्त करत, पुढील काळात प्रतिष्ठानला प्रशासनाकडून आवश्यक ते सर्व सहकार्य दिले जाईल, अशी ग्वाहीही त्यांनी दिली.
माजी आमदार प्रमोद जठार म्हणाले, “कोकणातील सांस्कृतिक चळवळ जिवंत ठेवण्याचे काम आचरेकर प्रतिष्ठान आणि रसिकांनी केले आहे. या चळवळीचे खरे भगिरथ म्हणजे रसिक आहेत. नाट्यरसिकांनी पाठ फिरवली तर नाट्यचळवळीला खीळ बसेल. त्यामुळे नवनवीन प्रयोग करत रसिकांचा सहभाग वाढवणे आवश्यक आहे.”
उद्योजक सुनील पाटील म्हणाले, “कणकवलीसारख्या भागात मच्छींद्र कांबळी यांच्या स्मृतिप्रित्यर्थ नाट्यमहोत्सव आयोजित होतो, ही अभिमानाची बाब आहे. आचरेकर सांस्कृतिक प्रतिष्ठानने सांस्कृतिक क्षेत्रात नवे प्रयोग करत तरुण पिढीला नाट्यचळवळीत सहभागी करून घ्यावे.”
कार्यक्रमाच्या सुरुवातीला मान्यवरांच्या हस्ते नाट्यमहोत्सवाचा शुभारंभ करण्यात आला. अॅड. एन. आर. देसाई यांनी मान्यवरांचे स्वागत केले. उपस्थित विश्वस्तांच्या हस्ते मान्यवरांचा सन्मान करण्यात आला. सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन शरद सावंत यांनी केले. यावेळी मोठ्या संख्येने नाट्यरसिक उपस्थित होते.
नाट्य महोत्सवाचा शुभारंभ करताना जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे सोबत माजी आमदार प्रमोद जठार, सुनील पाटील, एन. आर. देसाई आदी (छाया अनिकेत उचले )












