मनसेचे बंद केलेल्या एस.टीच्या फेऱ्या पुन्हा सुरू करण्यासाठी एस.टी.आगार व्यवस्थापक यांना निवेदन

पाटपन्हाळे (वार्ताहर ) महाराष्ट्र नवनिर्माण सेना गुहागर तालुक्याच्या वतीने गुहागर एस.टी.आगार व्यवस्थापक यांना
बंद केलेल्या एस.टीच्या फेऱ्या पुन्हा सुरू करण्याबाबत निवेदन देण्यात आले.या निवेदनात म्हटले आहे की,
उपरोक्त संघटनेच्या वतीने आपणास असे सूचित करीत आहोत की, गुहागर आगारातून सुटणाऱ्या एस.टीच्या काही गाड्या आपण बंद केलेल्या आहेत,त्यामुळे मिरज तसेच कोल्हापूर सारख्या ठिकाणी वैद्यकीय उपचारासाठी जाणाऱ्या रुग्णांची फार गैरसोय होत आहे तसेच ग्रामीण भागातील शालेय विद्यार्थ्यांना मोठ्या प्रमाणात पायपीट करून त्रास सहन करावा लागत आहे.गुहागर आगारातून सकाळी सुटणारी गुहागर मिरज तसेच गुहागर कोल्हापूर ,गुहागर तुळजापूर या बंद करण्यात आलेल्या गाड्या आपण लवकरच सुरू कराव्यात, “प्रवाशांच्या सेवेसाठी” हे आपले ब्रीदवाक्य सत्यात आणावे तसेच मौजे कौंढर काळसुर व त्या मार्गावरील विद्यार्थ्यांसाठी गुहागर व्हाया कौंढर काळसुर चिपळूण अशी महाविद्यालयात सुटण्याच्या वेळी गाडी सोडण्यात यावी जेणेकरून या मार्गावरील विद्यार्थ्यांचे हाल होणार नाहीत, गणपतीचा सण तोंडावर आला असल्याने आपल्या सेवेतील तत्परता दाखवावी.

अशीही विनंती करण्यात आली आहे. यावेळी बोलताना गुहागर एस.टी.आगार व्यवस्थापक पाथरे म्हणाले की, सध्या आगारात चालक वाहक यांची कमतरता असल्याने सर्व फेऱ्या सुरू ठेवण्यात अडचणी निर्माण होत आहेत. लांब पल्ल्याच्या एका फेरी साठी चार चालक वाहक यांची गरज असते, तसेच लांब पल्ल्याच्याकाही गाड्यांमधून उत्पन्न तुटपुंजे मिळत असते त्यामुळे हा निर्णय घ्यावा लागत आहे, तालुक्यातील ग्रामीण भागातून गाड्यांची मागणी ग्रामस्थ करीत आहेत, शक्य तेवढ्या फेऱ्या सुरू करण्याचा आमचा प्रयत्न आहे, उत्पन्न कमी आणि खर्च जास्त ही परिस्थिती सध्या सुरू असून प्रवाशी, विद्यार्थी यांच्या सोयीसाठी जास्तीत जास्त एस. टी. च्या फेऱ्या आम्ही सुरू करण्यासाठी प्रयत्नशिल आहोत, गुहागर डेपोचे उत्पन्न कसे वाढेल यासाठी आमचा प्रयत्न सुरू आहे. आगामी काही दिवसात बंद करण्यात आलेल्या फेऱ्या आम्ही पुन्हा सुरू करणार असल्याचे आश्वासन दिले