कोंकणी समाज ट्रस्ट’चा आशादीप मतिमंद मुलांच्या संस्थेला मदतीचा हात

 रत्नागिरी:
सण-उत्सव म्हणजे केवळ स्वतःचा आनंद नसून तो वंचितांच्या आयुष्यात सुखद क्षण फुलवण्याची संधी असते, हे ‘कोंकणी समाज ट्रस्ट’ने (एमआयडीसी-मिरजोळे) पुन्हा एकदा सिद्ध केले आहे. ईद-उल-फित्रचे औचित्य साधून ट्रस्टच्या वतीने रत्नागिरीतील ‘आशादीप मतिमंद मुलांची संस्था’ येथे सामाजिक बांधिलकी जपणारा एक विशेष उपक्रम राबवण्यात आला. या वेळी संस्थेतील मुलांना मिष्ठान्न भोजन देण्यात आले, तसेच त्यांच्या शैक्षणिक गरजांसाठी रोख स्वरूपात आर्थिक मदत सुपूर्द करण्यात आली.
​आनंद वाटण्याचा प्रामाणिक प्रयत्न
​केवळ स्वतःपुरता आनंद मर्यादित न ठेवता समाजातील विशेष मुलांच्या चेहऱ्यावर हसू फुलवणे, हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश होता. ‘आशादीप’ सारख्या सेवाभावी संस्थेला मदत करून कोंकणी समाज ट्रस्टने सणाचा खरा अर्थ अधोरेखित केला आहे. मतिमंद आणि दिव्यांग मुलांच्या गरजा समजून घेऊन त्यांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी संवेदनशीलता दाखवणे गरजेचे असल्याचे मत या वेळी व्यक्त करण्यात आले.

​रत्नागिरीतील ‘आशादीप’ ही संस्था गेल्या अनेक वर्षांपासून मतिमंद व दिव्यांग मुलांच्या निवासी निवारा आणि पुनर्वसनासाठी कार्यरत आहे. संस्थेचे संस्थापक-सचिव श्री. दिलीप रेडकर यांच्या मार्गदर्शनाखाली ही मुले केवळ सुरक्षित राहत नाहीत, तर स्वावलंबी होण्याचे धडेही गिरवत आहेत. संस्थेमध्ये मुलांना हस्तकला, पणत्या बनवणे आणि आकाशकंदील निर्मितीचे व्यावसायिक प्रशिक्षण दिले जाते, जेणेकरून त्यांच्या आयुष्यात आत्मनिर्भरतेचा प्रकाशाचा किरण निर्माण व्हावा.
​​या मदत सोहळ्याप्रसंगी कोंकणी समाज ट्रस्टचे अध्यक्ष श्री. सादीक मुकादम, सचिव श्री. मोहसीन मापारी, खजिनदार श्री. हुसेनमियाॅं (बाबू शेठ) मुकादम, ज्येष्ठ सदस्य श्री. मुनीर मिठा आणि श्री. लियाकत ठाकूर उपस्थित होते. तसेच ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते श्री. संजय वैशंपायन यांनीही उपस्थित राहून या उपक्रमाचे कौतुक केले. ‘आशादीप’चे संस्थापक श्री. दिलीप रेडकर यांनी ट्रस्टच्या या मदतीबद्दल कृतज्ञता व्यक्त केली.
​समाजातील दानशूर व्यक्ती आणि संस्थांच्या मदतीवरच अशा सेवाभावी संस्थांचे कार्य अवलंबून असते. कोंकणी समाज ट्रस्टने उचललेले हे पाऊल इतर संस्थांसाठीही प्रेरणादायी ठरणारे आहे.