दापोली (विशेष प्रतिनिधी) – दापोली येथील डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाचा ४४ वा पदवीदान समारंभ मोठ्या उत्साहात संपन्न झाला. या समारंभाला माजी केंद्रीय मंत्री सुरेश प्रभू प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते. यावेळी त्यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना सांगितले की, कृषी क्षेत्रात विविध आव्हाने असली तरी त्या आव्हानांना सामोरे जाण्याची क्षमता विद्यार्थ्यांमध्ये आहे. विद्यापीठाने शिक्षण, संशोधन आणि विस्तार कार्याच्या माध्यमातून ही क्षमता विकसित केली असल्याचे त्यांनी नमूद केले.
सुरेश प्रभू यांनी पुढे सांगितले की, देशाच्या जीडीपीमध्ये कृषी क्षेत्राचा वाटा सुमारे १४ टक्के असून उर्वरित ८६ टक्के हिस्सा सेवा व उत्पादन क्षेत्राचा आहे. २०४७ पर्यंत विकसित भारताचे स्वप्न साकार करण्यासाठी कृषी क्षेत्र अधिक सक्षम करणे गरजेचे आहे. कृषी पदवीधरांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून शेतीतील बदलत्या परिस्थितीशी जुळवून घेत देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकटी द्यावी, असे आवाहन त्यांनी केले.
यावेळी राज्याचे कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी दूरदृश्य प्रणालीद्वारे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. त्यांनी सांगितले की, सध्याच्या बदलत्या हवामानामुळे शेतीसमोरील आव्हाने वाढत आहेत. मात्र, या आव्हानांमध्येच संधी शोधण्याची गरज असून विद्यार्थ्यांनी आपल्या शिक्षणाचा उपयोग समाजाच्या आणि शेतकऱ्यांच्या हितासाठी करावा. “शेतीमध्ये जितकी संकटे तितक्याच संधी” हा दृष्टिकोन अंगीकारण्याचे आवाहन त्यांनी केले.
विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. संजय भावे यांनी प्रास्ताविक करताना सांगितले की, विद्यापीठात ६५ टक्के विद्यार्थिनी शिक्षण घेत असून यंदा सुवर्णपदक विजेत्यांमध्येही मुलींचा मोठा सहभाग आहे. कृषी शिक्षण घेतलेले विद्यार्थी भविष्यात विद्यापीठाचे नाव उज्ज्वल करतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. तसेच, विद्यापीठाला ‘अ’ दर्जा प्राप्त झाल्याबद्दल सर्व प्राध्यापक, अधिकारी, कर्मचारी आणि विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.
या समारंभात कृषी, कृषी अभियांत्रिकी, अन्न तंत्रज्ञान, जैवतंत्रज्ञान, वनशास्त्र, उद्यानविद्या आणि मत्स्यशास्त्र अशा विविध शाखांतील डॉक्टरेट, पदव्युत्तर आणि पदवी अभ्यासक्रम पूर्ण केलेल्या विद्यार्थ्यांना पदवी प्रदान करण्यात आली. विविध वर्षांतील सुवर्णपदके आणि पुरस्कारही मान्यवरांच्या हस्ते वितरित करण्यात आले.
कार्यक्रमास विद्यापीठाचे अधिकारी, प्राध्यापक, विद्यार्थी आणि पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. मकरंद करमरकर यांनी केले.










