महाराष्ट्रात मान्सूनच्या शेवटच्या टप्प्यातही पावसाने विश्रांती घेतली आहे. राज्यातील अनेक भागांत अपेक्षेप्रमाणे पाऊस न झाल्याने पावसाची तूट निर्माण झाली आहे. याचा परिणाम मराठवाडा आणि विदर्भातील काही भागांतील शेतीवर होत असून शेतकऱ्यांसमोर पिकांचे नुकसान आणि आर्थिक अडचणींचे आव्हान आहे. त्यामुळे आता परतीच्या पावसाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
17 सप्टेंबर रोजी कोकण विभागात बहुतांश ठिकाणी हवामान कोरडे, उष्ण आणि दमट राहण्याची शक्यता आहे. काही भागांत हलक्या पावसाच्या सरी पडू शकतात. मात्र मोठ्या पावसाचा अंदाज नसून कोणताही पावसाचा अलर्ट देण्यात आलेला नाही.
उत्तर महाराष्ट्रातील धुळे, नंदुरबार, जळगाव आणि नाशिक जिल्ह्यांतही प्रामुख्याने कोरडे हवामान राहण्याचा अंदाज आहे. काही ठिकाणी उन्हाचा चटका जाणवू शकतो. पश्चिम महाराष्ट्रातील अहिल्यानगर, पुणे, घाटमाथा, सातारा, सांगली आणि सोलापूर परिसरात काही ठिकाणी हलक्या सरींची शक्यता आहे. काही भागांत ढगाळ वातावरण राहण्याची शक्यता असून उष्ण आणि दमट हवामान जाणवू शकते.
मराठवाड्यात छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, बीड आणि हिंगोली येथे हवामान प्रामुख्याने कोरडे राहण्याची शक्यता आहे. तर लातूर, नांदेड आणि धाराशिवमध्ये काही ठिकाणी हलक्या ते मध्यम सरी पडू शकतात.
विदर्भातील बहुतांश भागांतही पावसाची उघडीप कायम राहण्याची शक्यता आहे. काही ठिकाणी ढगाळ वातावरणासह उष्ण आणि दमट हवामान राहू शकते. पुढील 4 ते 5 दिवसांत राज्यात मोठा हवामान बदल होण्याची शक्यता कमी आहे.
एकूणच, 17 सप्टेंबर रोजी राज्यात मोठ्या पावसाचा अलर्ट नाही. त्यामुळे पावसाची प्रतीक्षा कायम असून परतीचा मान्सून सक्रिय होण्याची शक्यता कधी निर्माण होते, याकडे शेतकरी आणि नागरिकांचे लक्ष लागले आहे.











