मागणीला रेल्वे प्रशासनाकडून सकारात्मक प्रतिसाद
रत्नागिरी | प्रतिनिधी : येणाऱ्या गणेशोत्सवात कोकण रेल्वेमार्गावर रेल्वेच्या नियमित गाड्या तसेच सोडण्यात येणाऱ्या जादागाड्या यामधून मोठ्याप्रमाणात चाकरमानी रत्नागिरी सिंधुदुर्ग जिल्ह्यात येणार आहेत. गेल्या दोन महिन्यांत कोकण रेल्वेमार्गावर धावणाऱ्या ट्रेन मधून प्रवाशांच्या मौल्यवान वस्तूंच्या चोरीच्या घटनांमधे वाढ झालेली दिसून येते.कोकण रेल्वे महामंडळ असल्याने मुळातच कोकण रेल्वेवरील रेल्वे सुरक्षा कर्मचाऱ्यांची संख्या अपुरी आहे.वाढलेल्या गाड्या, प्रवासी संख्या यांच्या तुलनेत हि संख्या तोकडी असल्याने रेल्वे मधील पेट्रोलिंग तसेच स्थानकांवरील सुरक्षा यात मर्यादित संख्येमुळे अडचणी येतात. म्हणूनच येणारा गणेशोत्सव लक्षात घेता गाडितील पेट्रोलिंग तसेच रत्नागिरी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील प्रमुख स्थानकांवर रेल्वे सुरक्षा बलांच्या संख्येत वाढ करण्याची मागणी कोकण रेल्वे प्रवासी सल्लागार समिती सदस्य सचिन वहाळकर यांनी कोकण रेल्वेचे व्यवस्थापकीय संचालक श्री. संजय गुप्ता यांच्याकडे केली होती.
यानुसार येत्या गणेशोत्सवात रेल्वेमार्गावर रेल्वेसुरक्षा बलांच्या राखीव गटातून अधिक प्रमाणात आवश्यक असलेल्या रेल्वे सुरक्षा कर्मचाऱ्यांची संख्या वाढवण्यात येईल अस कोकण रेल्वे व्यवस्थापकीय संचालक गुप्ता साहेब यांनी सचिन वहाळकर यांना कळवले असून यामुळे पर्याप्त रेल्वे सुरक्षा बल गर्दीच्या दिवसात उपलब्ध होणार आहे. या मुळे प्रवासी सुरक्षेतही वाढ होणार आहे. कोकण रेल्वेने याबाबत सकारात्मक प्रतिसाद दिल्याबद्दल सचिन वहाळकर यांनी श्री. संजय गुप्ता यांचे आभार मानले.











