मुलींना सैन्य दलात प्रवेशाची दालने खुली आहेत तर तरुणांनी एनडीए मध्ये प्रवेश घेतल्यास सार्थ अभिमान वाटेल – संजयराव कदम 

आबलोली (वार्ताहर)       विवीध क्षेत्रात करिअर करण्यासाठी मुला – मुलींना ,तरुण – तरुणींना आणि विद्यार्थ्यांना आज बरीचशी करीयर बाबतची क्षेत्रे उपलब्ध आहेत परंतू निष्णांत मार्गदर्शकां अभावी विद्यार्थी वर्ग मागे पडत आहे हि खंत व्यक्त करीत आज मुलींना तिन्ही सैन्यदलात प्रवेशाची दालने खुली असून देश प्रेमाखातर एनडीए मध्ये प्रवेश घेऊन तिन्हि सैन्य दलातील विवीध सैन्यधिकाराची पदे खडतर परिश्रमाने आत्मसात केल्यास स्वतः सह कुटुंबाला ,समाजाला,गावाला, तालुका, जिल्हा, राज्य,आणि देशाला तुमचा सार्थ अभिमान वाटेल असे कार्य करा असे स्पष्ट प्रतिपादन मातोश्री लक्ष्मीबाई कदम स्मृती मंच खेरशेत या कौटुंबिक, सेवाभावी संस्थेचे मुख्य प्रवर्तक श्री.संजयराव शांताराम कदम यांनी केले

‌‌ चिपळूण तालुक्यातील जय गणेश प्रतिष्ठान, खेरशेत (बेंडलवाडी) या मंडळाच्या वतीने नुकताच इयत्ता दहावी, बारावी व उच्चपदवी प्राप्त केलेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार व ‘करिअर मार्गदर्शन’ कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी यशस्वी विद्यार्थ्यांना भेटवस्तू, शाळापयोगी साहित्य देऊन सन्मानित करण्यात आले. त्याचप्रमाणे वकिलीची परीक्षा उत्तीर्ण झालेले अँड.प्रशितोष कदम, मेकॅनिकल इंजिनियर झाल्याबद्दल सारिका मते तर कनिष्ठ लेखाधिकारी, गुहागर या पदावर नियुक्त झालेले श्री. मिलिंद कदम यांचा सन्मानचिन्ह, शाल, पुष्पगुच्छ देऊन विशेष सत्कार करण्यात आला.

चिपळूण तालुक्यात गेली अनेक वर्ष कार्यरत असलेल्या जय गणेश प्रतिष्ठान, खेरशेत (बेंडलवाडी) या संस्थेच्या माध्यमातून नुकताच दहावी, बारावी व उच्चपदवी प्राप्त केलेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार व पुढील वाटचाली बद्दल ‘करियर मार्गदर्शन ‘या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले ‌होते यावेळी रत्नागिरी जिल्ह्यातील संगमेश्वर तालुक्यातील नावाजलेले युवा अभ्यासक प्रा. मिलिंद कडवईकर यांनी दहावी, बारावीनंतर पुढे काय ? या विषयावर विद्यार्थीसह पालकांपुढे करिअर मार्गदर्शनपरत्वे आपले अनुभवधिष्ठीत विचार मांडले. विद्यार्थ्यांची आवड निवड, कार्यक्षमता ,व्यवसायिक संधी यांचा परीक्षण करून स्वतःचे करिअर निवडावे. याकरिता संबंधित क्षेत्राचे ज्ञान असणारे शिक्षक वर्ग अथवा विचारवंत मार्गदर्शकांची नितांत गरज आहे. म्हणून प्रत्येक विद्यार्थ्यानी सजग राहून आपण आपल्या करिअरची निवड करून भविष्यात यशस्वी व्हावे अशी सदिच्छा व्यक्त केली.

तर बहुजन विकास आघाडीचे लढाऊ लोकनेते श्री. सुरेश भायजे यांनी ग्रामविकासाचा आढावा घेऊन शासनाच्या विविध उपयुक्त योजनांचा सर्वसामान्य लोकांना फायदा कसा होईल याविषयी सविस्तर ऊहापोह करुन बेंडलवाडी ग्रामस्थांनी यापूर्वीचा दारूबंदीचा निर्णय, नळ पाणी योजना व समाजमंदिर उभारणीच्या कार्याबद्दल श्री .सोमा बेंडल यांच्या नेतृत्व, कर्तृत्वा विषयी कौतुक केले. त्याप्रमाणे खेरशेतचे ज्येष्ठ समाजसेवक श्री काशीराम कदम गुरुजी यांनी छत्रपती शिवाजी महाराज ,महात्मा फुले राजर्षी शाहू महाराज आणि डॉ बाबासाहेब आंबेडकर या महापुरुषांच्या खडतर जीवन संघर्षाचे दाखले देऊन विद्यार्थ्यांमध्ये नवचेतना निर्माण केली. सामाजिक कार्यकर्ते विलास डिके, कृष्णाजी डिके, अनंत शिगवण यांनीदेखील आपल्या मार्गदर्शक भाषणातून शुभेच्छा व्यक्त केल्या.

यावेळी सन्मा. शरद कदम, अनंत कदम गुरुजी, रवींद्र मते, दत्ताराम लांबे, काशीराम बेंडल, सोनू बेंडल, चंद्रकांत बेंडल आणि महेश फेफडे आदी मान्यवर विचारपीठावर उपस्थित होते. सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रवींद्र घाणेकर यांनी सुस्पष्ट आणि माधुर्यतेने पेश करुन उपस्थितांची मने जिंकली. आभार श्री. सोमा बेंडल यांनी मानले कार्यक्रमाचे यशस्वीतेसाठी प्रतिष्ठानचे स्थानिक सदस्य तसेच मुंबई पुण्यातील सदस्यांनी विशेष परिश्रम घेतले.