समाजाच्या ऋणातून उतराई होण्यासाठी विद्यार्थ्यांनी समाजाभिमुख व्हावे : प्राचार्य डॉ. प्रफुल्लदत्त कुलकर्णी

रत्नागिरी : आपण समाजाचं देणं लागतो. त्याच्या ऋणातून उतराई होण्यासाठी समाजासाठी निस्वार्थ सामाजिक काम करणं आवश्यक आहे. यातून राष्ट्रप्रेम निर्माण होण्यास मदत होईल. विद्यार्थ्यांनी समाजाभिमुख व्हावे असे आवाहन प्राचार्य डॉ. प्रफुल्लदत्त कुलकर्णी यांनी केले.

रत्नागिरी एज्युकेशन सोसायटीच्या अभ्यंकर- कुलकर्णी कनिष्ठ महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या विशेष निवासी श्रमसंस्कार शिबीराच्या उद्घाटन प्रसंगी प्राचार्य डॉ. कुलकर्णी बोलत होते. दि. 16 ते 22 नोव्हेंबर या कालावधीत या विशेष शिबीराचे आयोजन कुर्धे येथील राधा पुरुषोत्तम पटवर्धन माध्यमिक विद्यामंदिरात करण्यात आले आहे.

उद्घाटनाला व्यासपीठावर ग्रुप ग्रामपंचायत मेर्वीच्या उपसरपंच सौ. स्वाती शिंदे, सदस्या सौ. साध्वी शिंदे, शिक्षण सुधारक समितीचे कार्याध्यक्ष वसंत फडके, कार्यवाह आनंद मराठे, उपप्राचार्य प्रा. सुनिल गोसावी, प्रा. दत्तात्रय वालावलकर, कार्यक्रमाधिकारी प्रा. निनाद तेंडुलकर, प्रा. अभिजीत भिडे, प्रा. अन्वी कोळंबेकर, प्रा. दीपा टिकेकर, डॉ. दानिश गनी व ग्रामस्थ जयंत फडके, प्रा. जयंत अभ्यंकर, प्रतिक फडके आदी उपस्थित होते.

एन.एस.एस. गीताने व दीपप्रज्वलनाने कार्यक्रमाला सुरवात झाली. प्रा. निनाद तेंडुलकर यांनी मान्यवरांचा परिचय करुन दिला व सर्वांचे स्वागत केले. प्रास्ताविकात त्यांनी शिबीरातील सत्रांचा आढावा घेतला. उपसरपंच सौ. स्वाती शिंदे यांनी विद्यार्थ्यांचे स्वागत केले व शिबीराला शुभेच्छा दिल्या. प्रा. सुनिल गोसावी यांनी विद्यार्थ्यांना सर्व सत्रात मनापासून सहभागी होण्याचे आवाहन केले. शिबीराचा व्यक्तिमत्त्व विकासासाठी उपयोग करुन घ्या, असे सांगितले. कार्यवाह आनंद मराठे यांनी आपल्या मार्गदर्शनात विद्यार्थ्यांनी शिबीरात ग्रामीण जीवनशैलीचा अनुभव घ्यावा आणि यात समरस व्हा असे सांगितले.

या निवासी शिबीरांतर्गत श्रमसंस्कारातून वनराई बंधारा, बारव स्वच्छता, समुद्र किनारा स्वच्छता करण्यात येणार आहे. विद्यार्थ्यांच्या बौध्दिक व मानसिक विकास साधण्याच्या दृष्टिकोनातून विविध कार्यशाळा, व्याख्याने, खेळ, चर्चासत्रे, स्पर्धा याचे आयोजन केले आहे. सूत्रसंचालन प्रा. अन्वी कोळंबेकर यांनी केले. प्रा. अभिजीत भिडे यांनी आभार मानले. या शिबीराचे नियोजन प्राचार्य व उपप्राचार्य यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यक्रमाधिकार्‍यांनी केले.