सावंतवाडी । प्रतिनिधी : न्हावेली, तिरोडा, नाणोस व गूळदुवे पंचक्रोशीतील बिबट्या तसेच पटेरी वाघाच्या वाढत्या उपद्रवाबाबत शुक्रवारी ग्रामस्थांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी उपवनसंरक्षक नवाकिशोर रेड्डी यांची भेट घेत बिबट्या व अन्य प्राण्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी केली. येत्या पंधरा दिवसात याबाबत उचित कार्यवाही न झाल्यास मनसेच्या माध्यमातून बोंबाबोंब आंदोलन छेडण्यात येणार असल्याचे निवेदन सादर केले. यावेळी उपवनसंरक्षक रेड्डी यांनी संध्याकाळी तातडीने सावंतवाडी वनपरीक्षेत्रातील वनक्षेत्रपाल अधिकारी यांची तातडीने बैठक घेऊन पथक नेमून वन्यप्राण्यांचा बंदोबस्त केला जाईल असे आश्वासन दिले.
सावंतवाडी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचें माजी शहराध्यक्ष तसेच विद्यार्थी सेनेचे जिल्हाध्यक्ष आशिष सुभेदार यांच्या नेतृत्वाखाली न्हावेली, तिरोडा, नाणोस गुळदुवे पंचक्रोशीतिल पदाधिकाऱ्यांनी यां भागातील वाघ व बिबट्याच्यां मुक्त वावर तसेच ग्रामस्थांना होणाऱ्या त्रासाबाबत पुन्हा वनवीभागात धडक दिली. यावेळी उपवनसंरक्षक नवाकिशोर रेड्डी यांची भेट घेत ग्रामस्थांनी आपल्या व्यथा मांडल्या. यावेळी मनसे पदाधिकारी तथा ग्रा.प सदस्य अक्षय पारसेकर यांनी वाघ, बिबट्या यांच्या मुक्त वावर तसेच उपद्रवामुळे पंचक्रोशीत भीतीचे वातावरण पसरले आहे. मागच्या वेळी मागणी करून देखील यां वन्यप्राण्यांचा अद्याप बंदोबस्त करण्यात आलेला नाही. ग्रामस्थांच्या मागणीकडें वनविभाग दुर्लक्ष करीत आहे असा आरोप यावेळी त्यांनी केला.
ग्रामस्थ आपला जीव मुठीत धरून यां भागातून ये जा करीत आहेत याची साधी दखल देखील वनअधिकारी यांनी घेतली नाही.
न्हावेली तीरोड्यासह अन्य भागात सतत पाळीव प्राण्यांवर वन्यप्राण्याकडून हल्ले होत आहेत. तसेच वाघ बिबट्या यांच्याकडून रात्रीच्या वेळी ये जा करणाऱ्या मोटर सायकल स्वार यांचा पाठलाग करण्यात येत आहे त्यामुळे रात्रीच्या वेळी बाहेर पडण्यास भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे या सर्व बाबी उपवनसंरक्षक रेड्डी यांच्यासमोर मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी मांडल्या.
यावेळी माजी शहराध्यक्ष तथा विद्यार्थी सेनेचे जिल्हाध्यक्ष आशिष सुभेदार ग्रा.प सदस्य अक्षय पार्सेकर,विद्यार्थी सेनेचे तालुका सचिव मनोज कांबळी, तालुका उपाध्यक्ष प्रणित तळकर, विभाग अध्यक्ष चेतन पार्सेकर, उदय परब महादेव पालव राजू परब नवनाथ पार्सेकर प्रथमेश नाईक आदी उपस्थित होते.












