कोकणचा कॅलिफोर्निया झाल्याशिवाय रहाणार नाही; आम्ही कोकणचा विकास करणारच; कोकणच्या विकासाला काही कमी पडू देणार नाही अशी वक्तव्य गेली अनेक वर्षे ऐकत आलोय. समजायला लागल्यापासून कोकणातल्या निवडणुका या अनेक वर्षे ‘कोकणचा कॅलिफोर्निया’ या एकाच वाक्याभोवती भाषणांचा फेर धरलेला असायचा.
कोकणवासियांना कोकणचा कॅलिफोर्निया की काय ते काहीच माहिती नसायचे. कोकणचा कॅलिफोर्निया होणार म्हणजे नेमक काय होणार हा प्रश्न अनेकांना पडायचा. परंतु काय तरी होणार असं उगाचच त्याकाळी वाटत रहायच. निवडणुका जाहीर झाल्या की गावो-गावी विजेचे दोन-तीन पोल (विजेचे खांब) येऊन पडायचे.
गावात लवकरच ‘लाईट येतली’ अशी चर्चा होईपर्यंत त्यातलाच एक पोल बाजूच्या गावात जाऊन पडलेला असायचा. सारीच भूतचेष्ठा वाटायची. कारण ३०-४० वर्षापूर्वी पाणी, विज, रस्ते याच ग्रामीण भागातील जनतेच्या आवश्यक मुलभूत गरजा होत्या. यामुळे गावातला रस्ता होतोय. डांबरी नव्हे समजल ना साधा दगड मातीचा तरीही गाववाल्यांना किती आनंद व्हायचा. कारण विकास हा शब्दचमुळी कोकणापासून कोसोमैल दूर होता. विकासावर चर्चा जरूर व्हायची. परंतु ती विकासप्रक्रिया एकतर कागदावर किंवा भाषणातून अशा दोनच ठिकाणी पहायला मिळायची.
काँग्रेसी सत्तेच्याकाळात महाराष्ट्रावर पश्चिम महाराष्ट्राचे वर्चस्व होते. एकट्या सांगली जिल्ह्यातले अधी डझन मंत्री असायचे. विदर्भ, मराठवाडा, कोकण हे कायमच विकासाच्या प्रतिक्षेत असल्याचे पहायला मिळायचे. पश्चिम महाराष्ट्राच्या राजकारणातून एक गोष्ट महाराष्ट्राने शिकण्यासारखी होती. आणि आजही आहे. साखर कारखानदारीमुळी पश्चिम महाराष्ट्रात गटा-तटाचे राजकारण फार चालायचे. माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील, वाळव्याचे राजाराम बापू पाटील (जयंत पाटील यांचे वडील) यांच्यातील विळया-भोपळयाचे नाते सर्वश्रुत होते.
परंतु विकासाच्या बाबतीत कोणीही कुणाच्याही आड आलेलं नाही. साखर कारखानदारीचे शासनाच्या तिजोरीतील अनुदान घेताना आम्ही सारे एक अशाच भावनेतून कारभार करायचे. अशी ही विकासाची एकजुट पूर्वीही कधी दिसली नाही. की आम्ही दिसत नाही. मात्र, खरंतर कोकणाला १९९५ नंतर खऱ्याअर्थाने विकास कसा असतो तो दिसायला लागला. १९९० नंतर कोकणच्या विकासाची व्हीजन घेऊन चर्चा सुरू झाली. जसे की जेव्हा पाणी, रस्ते, विज या मूलभूत गरजांच्या सोडवणुकीसाठी प्रयत्न व्हायला लागले. पूर्वी कोकणातील तरूणांची गरज म्हणून पुणे, मुंबईत नोकरीसाठी जावं लागत आहे. पूर्वी गिरणीत नोकरी मिळाली की कोकणात तरूण खुश व्हायचा कारण कोकणात थांबून मुंबईकर चाकरमान्यांच्या मनिऑर्डरची वाट पहावी लागायची काळ बदलला चाकरमान्यांची मनिऑर्डर बंद झाली.
वेगवेगळया व्यवसायातून गावात पैसा येऊ लागला. दोन वेळच्या जेवणाची ज्या कुटुंबात, घरात भ्रांत होती त्या कुटुंबात थोडीफार आर्थिक संपन्नता आली. नवी पिढी इंजिनियर झाली. परंतु पुन्हा तोच प्रश्न उपस्थित झाला. इंजिनियर झालेल्या तरूणांना नोकरी शोधण्यासाठी पुणे, मुंबई, नाशिक, नागपूर आदी शहरांमधील आयटी कंपनीत नोकरीचा शोध सुरू झाला. कोकणात इंजिनिअरींग शिकलेल्यांना नोकरी नाही. कोणताच प्रकल्प कोकणात नको म्हणणाऱ्यांनी कोकणातील तरूणांची नोकरीसाठी होणारी फरफट कशी आहे हे एकदा पहावी. म्हणजे समजून येईल. निवडणुका येतात आणि जातात.
सर्वसामान्य लोकही यात फार स्वारस्य घेत नाहीत. आश्वासन दिली जातात. या आश्वासनांच पुढे काय झालं हे जनता पहात नाही. यामुळेच आश्वासन द्यायला काय जात. जनतेच्या काही लक्षात रहात नाही असा एक राजकीय समाजव्यवस्थेत रूढ बनत चाललाय. जनतेने कामाच मूल्यमापन करायला हवं. हे मूल्यमापनच होत नाही. ही वस्तुस्थिती आहे.
विकासकाम करणारा आणि फक्त आश्वासन देणारा यांची बरोबरी होऊच शकत नाही. विकासकाम ही दृष्टीपथात असली पाहिजेत. विकास हा काही कुणाला दडवून किंवा झाकून ठेवता येणार नाही. खरंतर तो सांगण्याचाही विषय नाही. यामुळे विकास कोणी दाखवला, विकास कोण करतोय फक्त आश्वासन कोण देतय हे लोकांना समजून घेतले पाहिजे.
बऱ्याचवेळा निवडणुककाळात बराच भुलभलैया सुरू असतो. एक ‘ हिफ्नॉटिझमच’ वातावरण तयार केलं जात. चांगल वाईट त्याचे परिणाम याचा विचार करता येण्याची आवश्यकता असते. जनता सजग असेल तर आश्वासनांच्या हिंदोळयावर आपणाला कोणी झुलवणार नाही. हे पक्क लक्षात ठेवलं पाहिजे. सतत जागरूक, सतर्क असलच पाहिजे. ज्यादिवशी मतदान असत त्या मतदानाच्या दिवशीही आपण मतदान केलंच पाहिजे.
विकासाचा विचार हा सतत डोक्यात असला पाहिजे. नाहीतर होत काय आश्वासनांच मायाजाल असं काही आणि एवढ तयार केलं जात की आश्वासनांच्या मायाजालात विकास आपणच विसरून जातो. तो कधीही विसरू द्यायचा नाही.
यापुढच्याकाळात कोकणवासियांनी विकासाला प्राधान्य दिलं पाहिजे. जे आजवर कधी दिलं नाही. त्याचा सर्वंकष विचार करण्याची आवश्यकता आहे. आपणाला आश्वासनांचा, आणि विकासाचा हिशोब मांडता यायला पाहिजे. निवडणुकीचा कालावधी आहे. आश्वासनांचा आणि विकासाचा हिशोब मांडण्यात गैर काहीच नाही.
त्यामुळे नेमकेपणाने आपण कुठे आहोत हे आपणाला समजून येईल. आपलं काही चुकतय का ? याचा अचूक निर्णय आपणाला घेता येतो. कोकणातील सूजान नागरीक म्हणून हा विचार करायलाच पाहिजे. असा कोणताही विचार न करता जे चाललय ते तसच चालू ठेवण्यात अर्थ नाही. शेवटी नुकसान आणि दिर्घकालीन फायदे कशात आहेत याचा विचार आपणाला करायला पाहिजे. नव्या पिढीचे भवितव्याचा विचार यामध्ये असला पाहिजे. शेवटी येणारी पिढी कोकणात स्थिरावली पाहिजे असे वाटत असेल तरचा विचार हा केलाच पाहिजे.












