सावंतवाडीत ‘अवकाळी ‘चे धुमशान सुरूच 

 

ढगांच्या गडगडाटासह जोरदार पाऊस 

विजांचा लखलखाट : उपकरणं जळाली 

गारव्यामुळे मात्र काही प्रमाणात दिलासा 

सावंतवाडी । प्रतिनिधी : शनिवारी सकाळपासूनच काही प्रमाणात ढगाळ वातावरण व उष्मा वाढलेला असल्यामुळे पावसाचा अंदाज व्यक्त केला जात असतानाच सावंतवाडी शहरासह तालुक्यात दुपारी ४ च्या सुमारास अवकाळी पावसाने जोरदार बरसात केली. ढगांचा गडगडाट व विजांच्या लखलखाटासह पावसानं हजेरी

लावल्याने महावितरणची बत्ती गुल झाली. तर काही ठिकाणी विजेच्या लखलपाटामुळे विजेची उपकरणे जळाली.

दरम्यान, अचानक कोसळलेल्या पावसामुळे नागरिकांची चांगलीच तारांबळ उडाली. कोणताही अंदाज नसताना आलेल्या पावसामुळे जनजीवन पुरते विस्कळीत झाले. मात्र, पावसामुळे हवेत गारवा निर्माण झाल्याने उष्म्यामुळे हैराण झालेल्या नागरिकांना काही प्रमाणात दिलासाही मिळाला.

शनिवारी सकाळपासूनच हवेत मोठ्या प्रमाणात उष्मा वाढला होता तर वातावरणही ढगाळ होते. त्यामुळे पावसाचा अंदाज व्यक्त केला जात होता. अशातच दुपारी चारच्या सुमारास अचानकपणे ढगांच्या गडगडाटासह पावसाची रिपरिप सुरू झाली. बाजारपेठेतील नागरिकांनी त्वरित घरांचा तसेच दुकानांचा आडोसा घेतला. मात्र, बाजारपेठेतील उघड्यावरच्या दुकानदारांची मोठी तारांबळ उडाली. आंबे तसेच इतर फळफळावर व हंगामी विक्रेत्यांना या पावसाचा मोठा फटका बसला.

एकीकडे पावसामुळे जीवसृष्टीला दिलासा मिळाला असतानाच शेवटच्या टप्प्यातील आंबा, काजू, फणस पिकाला मात्र पावसाचा फटका बसणार आहे. तर ऐन बेगमीचे आणि लग्नसराईचे दिवस असल्याने नागरिकांची ही धांदल उडाली आहे. पाऊस असाच सुरू राहिल्यास त्याचा फळ पिकावर मोठ्या प्रमाणात परिणाम होणार असल्याची भीती शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे.