रिफायनरीचे स्वागत करणार; समर्थनार्थ भव्य मोर्चा काढणार : खा. नारायण राणे

रत्नागिरी : प्रतिनिधी

कोकणातील बेरोजगारी दूर होण्यासाठी बारसू येथे ग्रीन रिफायनरी प्रकल्प होणे अत्यावश्यक आहे. त्याचवेळी स्थानिकांचे मतपरिवर्तन करून वातावरण निर्मिती कारणे आवश्यक आहे. त्यासाठी पाऊस संपल्यानंतर रिफायनरीचे स्वागत करू. विरोधकांना जे काय करायचे ते करूद्या. आपण रिफानयरीच्या समर्थनार्थ विराट मोर्चा काढणार असल्याची माहिती खासदार नारायणराव राणे यांनी पत्रकार परिषदेत दिली.

पत्रकारांच्या प्रश्नांना उत्तर देताना ते म्हणाले कि, रत्नागिरी जिल्ह्याचे दरडोई उत्पन्न वाढविण्यासाठी माध्यम उपलब्ध करून द्यायचे आहे. त्यासाठी कृषी प्रक्रिया उद्योग व्यवसाय वाढविण्यात येणार आहेत. स्थानिक बेरोजगारांना रोजगार मिळावा, यासाठी त्यांना चांगले शिक्षण देऊन कुशल केले जाईल. त्यातून त्यांना नोकरी मिळून उत्पन्न वाढविण्यास मदत होणार आहे. बारसू रिफायनरी प्रकल्प येण्यासाठी माझा नुसता प्रयत्न सुरू नाही. तर माझ्या सुशिक्षित बेरोजगार तरुणांसाठी हा उद्योग आणायचाच आहे. त्यासाठी वातावरण तयार करून पाऊस गेल्यावर रिफायनरीचे दणक्यात स्वागत केले जाईल. विरोध करणाऱ्यांना काय समजायचे ते समजू द्या. पण समर्थनार्थ एक भव्य मोर्चा काढला जाईल. जिल्ह्यात जे उद्योग येतील ते आणणार. आधुनिक टेक्नॉलॉजी कशी येईल, यासाठी माझा प्रयत्न आहे.
जिल्ह्यात मोठमोठे उद्योग आल्यानंतर आपोआपच विमानतळ सुरू होईल असे ते म्हणले.

मुंबई-गोवा या राष्ट्रीय महामार्गाचे चौपदरीकरण का रखडले आहे, याबाबतही अधिकारी, ठेकादारांना बोलवून माहिती घेणार आहे. त्यानंतर त्यांना मुदत दिली जाईल, त्याच कालावधीत हा महामार्ग पूर्ण करून घेऊ. जिल्ह्यात पर्यटन वाढीसाठी पंचतारांकित हॉटेलसह अन्य पायाभुत सुविधाची गरज आहे. पर्यटकांना काय आवश्यक आहे. त्यांची आवड, निवड, याचा विचार करून सुविधा निर्माण करण्याची गरज आहे. त्यामुळेच पर्यटन वाढणार आहे. येत्या काही काळात सिंधुदुर्ग प्रमाणे रत्नागिरी पर्यटन जिल्हा करण्याचा प्रयत्न आहे, असे खा. राणे यांनी सांगितले.
जलजीवन मिशन योजनेबाबत काही तक्रारी आल्या आहेत. या योजनेचीही माहिती घेऊन दर्जेदार कामे कशी होतील याबाबत प्रयत्न करू, त्याची चौकशी करू आणि राणे आले म्हणजे दर्जा आला, असेही त्यांनी स्पष्ट केले.