पंधरागाव पट्ट्यातील ग्रामस्थांनी मानले माजी आ. नातू यांचे आभार

 

खेड(प्रतिनिधी) खेड आगारातून रोज सकाळी साडे नऊ वाजता पंधरागाव पट्ट्यातील साखर या ठिकाणी जाणारी एस.टी. बस फेरी गेले काही महिने बंद करण्यात आलेली होती. ती सुरू झाल्याने येथील ग्रामस्थांनी माजी आम विनय नातू यांचे आभार मानले

बस वेरळ मार्गे तिसंगी, कुळवंडी, खोपी, कासई, कावळे, तळवटपाल, धामणंद मार्गे साखर या ठिकाणी जाते. या एस.टी. बसमुळे पंधरागाव पट्ट्यातील अनेक ग्रामस्थांचा खेड सह आजूबाजूच्या गावात जाण्याचा मार्ग सुकर होत होता. दवाखाना – बाजारहाट या ठिकाणी जाण्यासाठी देखील ही बस फेरी उपयुक्त ठरत होती. ती बस खेड आगारातून काही महिन्यापासून बंद करण्यात आलेली होती.

ही बस फेरी पुन्हा सुरू करण्यासाठी पंधरा गाव पट्ट्यातील अनेक ग्रामस्थांनी माजी आमदार विनय नातू यांच्या कडे निवेदने दिली होती. तर अनेक विनय नातू यांच्या गावभेट दौऱ्याच्या दरम्यान अनेक ग्रामस्थांनी या गाडीची मागणी केली होती. त्यामुळे या संदर्भात माजी आमदार विनय नातू यांनी रत्नागिरी येथील विभाग नियंत्रक श्री. बोरसे यांच्याशी संपर्क साधून ही बस सेवा पूर्ववत केली. ही बस सेवा सुरू करण्यासंदर्भात स्थानिक पातळीवर देखील भाजप चे जिल्हा सरचिटणीस विनोद चाळके व भाजप चे खेड शहराध्यक्ष अनिकेत कानडे यांनी देखील या संदर्भात खेड चे आगार प्रमुख श्री‌. राजेशिर्के यांच्याकडे निवेदन सादर केले होते. त्यामुळे गणेशोत्सव काळात पंधरा गाव पट्ट्यात गाठी भेटी घेताना माजी आ. नातू यांचे तळवटपाल येथील ग्रामस्थ संदीप शिरावले यांनी पुष्पगुच्छ देऊन आभार मानले. यावेळी त्यांच्या समवेत पंचक्रोशीतील ग्रामस्थ उपस्थित होते. ही बस सेवा अविरतपणे सुरू रहील असे आश्वासन माजी आ‌. नातू यांनी यावेळी उपस्थित ग्रामस्थांना दिले.