
आपल्याकडे असलेले सर्व पुरावे द्या, आपण चौकशी करून कार्यवाही करू – अप्पर जिल्हा पोलीस अधीक्षक जयश्री गायकवाड
गुहागर : गुहागर पोलीस स्थानकाचे पोलीस निरीक्षक सचिन सावंत याच्या विरोधातील आपल्याकडे असलेले सर्व पुरावे द्या, आपण योग्य ती चौकशी करून श्री. सावंत यांच्यावर कारवाई करू, या अप्पर जिल्हा पोलीस अधीक्षक जयश्री गायकवाड यांच्या
आश्वासनानंतर प्रजासत्ताक दिनापासून तीन दिवस सुरु असलेले उपोषण अडूर बौद्धवाडी येथील ग्रामस्थ्यांचे स्थगित केले. मात्र, येत्या 15 दिवसात याबाबत कोणतीच कार्यवाही न झाल्यास आपण राज्यव्यापी आंदोलन छेडू असा इशारा बौद्धजन सहकारी संघ, अडूर शाखा क्र. 4 ने प्रशासनाला दिला आहे.
पोलीस निरीक्षकांच्या बदलीसाठी अडूर ग्रामस्थ्यांचे उपोषण
पोलीस प्रशासनाने गुहागर तालुक्यातील अडूर येथे धम्मचक्र प्रवर्तन दिन व महापरिनिर्वाण दिनी बौध्द विहारला ठाळे ठोकणे, सशस्त्र पहारा ठेवणे पुजापाठापासून वंचित ठेवल्याने गुहागरचे पोलीस निरीक्षक सचिन सावंत यांच्या बदलीच्या मागणीसाठी बौध्दजन सहकारी संघ, अडूर (स्थानिक) शाखा क्र. 40 च्या ग्रामस्थांनी 26 जानेवारी पासून गुहागर तहसील कार्यालया समोर उपोषणाचा मार्ग स्वीकारला आहे. या उपोषणात गावातील पुरुष, महिला व शाळकरी मुले सहभागी झाले होते. मंगळवारी सकाळी उपोषणकर्त्यांमधील काही ग्रामस्थांची तब्बेत बिघडली होती. त्याच्यावर उपचार करण्यात आले. ग्रामस्थांनी उपोषण मागे घ्यावे, यासाठी तहसीलदार परीक्षित पाटील, विभागीय पोलीस अधिकारी श्री. राजमाने यांनी प्रयत्न केले. मात्र, पोलीस निरीक्षक सचिन सावंत यांची बदली होत नाही, तो पर्यंत आम्ही उपोषण मागे घेणार नाही, असा पवित्रा ग्रामस्थांनी घेतला. त्यामुळे प्रशासनासमोर मोठे संकट उभे राहिले होते.
दरम्यान, मंगळवारी दुपारी अप्पर जिल्हा पोलीस अधीक्षक जयश्री गायकवाड उपोषण स्थळी दाखल झाल्या. त्यांनी प्रथम गुहागर पोलीस स्थानकात जाऊन पोलीस प्रशासनाची बाजू ऐकून घेतली. त्यानंतर त्या बाहेर उपोषणास बसलेल्या ग्रामस्थाची भेट घेतली. यावेळी त्यांच्या समवेत तहसीलदार परीक्षित पाटील, विभागीय पोलीस अधिकारी श्री. राजमाने होते. गायकवाड यांनी उपोषणकर्त्यांची बाजू ऐकून घेतली. यावेळी ग्रामस्थांनी आक्रमकपणे आपली बाजू त्यांच्यासमोर मांडली. आमचा पोलीस प्रशासनाशी कधीच वाद झालेला नाही, आम्ही कायदा मानणारे लोकं आहोत. संविधानाने आम्हाला अनेक अधिकार दिले आहेत. परंतु, बाबासाहेबांचा अपमान आणि कोणतीही परवानगी नसताना बुद्ध विहाराला टाळे टोकले जात असतील तर आम्ही कदापि सहन करणार नाही. असे कृत्य करणाऱ्या सचिन सावंत यांची तातडीने बदली करण्यात यावी, अशी मागणी ग्रामस्थांनी केली. तसेच सावंत हे आपल्या समर्थनासाठी तालुक्यातील काही प्रतिष्ठित लोकांना बोलावून स्वतःच तयार केलेल्या निवेदनावर त्यांच्या फसवून सह्या घेतल्या. हे निवेदन जेव्हा आम्ही पाहिले तेव्हा या लोकांकडे चौकशी केली असता, सदरील निवेदन कोणत्या विषयासाठी वापरण्यात येणार आहे, याची कल्पना त्यांना नव्हती. त्यांनी ते निवेदन तयार केले नव्हते, अशी माहिती ग्रामस्थांनी अप्पर जिल्हा अधीक्षक जयश्री गायकवाड यांना दिली.
आपण मांडलेल्या मुद्यानुसार व आपल्याकडून प्राप्त झालेल्या निवेदनातील मुद्यांची सविस्तर चौकशी करून योग्यती कार्यवाही केली जाईल, असे लेखी पत्र अप्पर जिल्हा पोलीस अधीक्षक जयश्री गायकवाड यांनी उपोषणकर्त्यांना दिले. आपल्या भावनांचा आदर करून सकारात्मक प्रतिसाद दिल्याने अडूर बौद्धवाडी येथील ग्रामस्थांनी आपले तीन दिवसांपासून सुरु असलेले उपोषण अप्पर जिल्हा पोलीस अधिक्षिका यांच्या हस्ते लिंबू पाणी घेऊन स्थगित केले.












