रत्नागिरी : क्षत्रिय मराठा मंडळाच्या वतीने रत्नागिरीत अंबर हॉल येथे महिलांचा मेळावा आयोजित केला. या मेळाव्याला उदंड प्रतिसाद लाभला. वर्षभरात धावपळीच्या जगण्यात महिला विविध भूमिका निभावतात. नोकरी, व्यवसाय, कौटुंबिक जबाबदाऱ्या यातून एक दिवस आपल्यासाठी या हेतूने या महिला मेळाव्याचे आयोजन करण्यात आले.
सांस्कृतिक कार्यक्रम, विविध क्षेत्रातील प्रथितयश महिलांच्या मुलाखतीद्वारे विचार, मार्गदर्शन असे कार्यक्रमाचे स्वरूप होते. माजी नगरसेविका सौ. शिल्पा सुर्वे, राष्ट्रीय पातळीवरील बॅडमिंटनपटू सौ. सरोज सावंत, इतिहास संशोधिका डॉ. सौ. संयोगिता सासणे, करिअरची वेगळी वाट निवडणाऱ्या सौ. कश्मिरा सावंत यांच्याशी संवाद साधत गप्पागोष्टी रंगल्या. माजी प्राचार्य सौ. मंजिरी साळवी यांनी त्यांना बोलते केले. या वेळी मान्यवरांनी आपापले विचार, आलेल्या समस्या, त्यावेळी कुटुंबाचा मिळालेला पाठिंबा यावर छान विचार व्यक्त केले. महिलांनी आपल्याला पुढे जायचं असेल तर प्रामाणिक प्रयत्न, कामातील सातत्य हे महत्त्वाचं आहे याबाबत उद्बोधन केले.
आपले अंगचे कलागुण सादर करण्याची मिळालेल्या संधीचा लाभ घेऊन फॅन्सी ड्रेसचे सादरीकरण केले. यात संध्या नाईक, प्रियांता सासुलकर यांच्या विशेष अभिनयाने सर्वांना मंत्रमुग्ध केले. अॅड. योगिनी सावंत, सौ. रश्मी चव्हाण, सौ. सविता चव्हाण यांनी मीराबाई-श्रीकृष्ण व राधा यांच्या सादरीकरणाने कार्यक्रमाची रंगत वाढली. अॅड. योगिनी सावंत यांनी संकासूर सादर केला.
विशेष म्हणजे ६० वर्षांच्या वंदना जाधव यांनी भाजीवालीच्या रूपात येऊन हल्लीची तरुण पिढी परदेशात जाऊन आई-वडिलांकडे दुर्लक्ष करतात, याबाबत डोळ्यात अंजन घालणारे विचार व्यक्त केले. प्रियांका सासुलकर, प्रणाली साळवी, शर्वरी बारस्कर यांनी उत्कृष्ट लावणी नृत्य, पूजा नाईक हिने कविता वाचन केले. मंडळाच्या उपाध्यक्षा प्राची शिंदे यांनी प्रश्नमंजुषा व ग्रुप गेम्सने बहारदार कार्यक्रमाची सांगता केली. महिलांना या मेळाव्यातून नवीन उर्जा मिळाली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन महिला समिती अध्यक्ष सौ. श्रेया इंदुलकर यांनी केले.











