खेड भोस्ते घाटातील अपघातांची मालिकाही कायम, वाहनचालकांवर धोक्याची टांगती तलवल
खेड(प्रतिनिधी) मुंबई-गोवा महामार्गावरील भोस्ते घाटातील अवघड वळणावर खचलेल्या संरक्षक भिंतीवर अखेर डागडुजी करण्यात आली आहे. मात्र डागडुजी करताना केवळ मलमपट्टी करण्यात आल्याने वाहनचालकांवर धोक्याची टांगती तलवार कायम आहे. त्यातच अपघातांची मालिकाही सुरू असल्याने वाहनचालकांची सुरक्षितता ऐरणीवर आली आहे.
भोस्ते घाटात अवघड वळणावर विशेषतः अवजड वाहतुकीच्या वाहनांना घडणाऱ्या अपघातांमुळे संरक्षक भिंतीची नासधूस होवून भिंतही कमकुवत बनली आहे. गेल्या ४ महिन्यात ३५हून अधिक अपघात घडले आहेत. अजूनही घाटात अपघातांचे सत्र सुरूच आहे. तरीदेखील राष्ट्रीय महामार्ग खाते
सुस्तच असल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. आठवडाभरापूर्वी संरक्षक भिंत खचल्याने वाहतुकीस धोका निर्माण झाला होता, टीकेची झोड उठल्यानंतर राष्ट्रीय महामार्ग खात्याकडून संरक्षक भिंतीची डागडुजी करण्यात आली असली तरी कायमस्वरुपी उपाययोजनांचा अवलंब न करता केवळ मलमपट्टी करण्यात आली आहे.










