‘ओंकार’ अत्याचार प्रकरणी  गुणेश गवस यांचे ठिय्या आंदोलन

बांदा l प्रतिनिधी :‘ओंकार’ हत्तीवरील अत्याचार प्रकरणी वनखात्याने दिलेल्या आश्वासनांची पूर्तता न झाल्याने वाफोली येथील सामाजिक कार्यकर्ते गुणेश गवस यांनी अखेर आज बांदा येथील श्रीराम चौकात ठिय्या आंदोलन सुरू केले. ठिय्या आंदोलनाला प्राणीप्रेमी व नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. आज समाधानकारक तोडगा न निघाल्यास उद्यापासून आमरण उपोषण सुरू करणार, अशी प्रतिक्रिया गुणेश गवस यांनी ‘प्रहार डिजिटल’ शी बोलताना दिली.

 

ओंकार हत्तीला १० नोव्हेंबर रोजी लाकडी दांड्याने मारहाण करणारे तसेच सुतळी बॉम्ब फेकून त्याला मानसिकदृष्ट्या अस्थिर करण्याचा प्रयत्न करणाऱ्या संबंधितांवर कठोर कारवाई करण्यात यावी, दोषींना सेवेतून निलंबित करावे तसेच ओंकारला त्याच्या नैसर्गिक अधिवासात सोडावे या मागण्यांसाठी आमरण उपोषण सुरू केले होते. त्यावेळी वनपरिक्षेत्र अधिकारी सुहास पाटील यांनी उपोषण मागे घेण्याची विनंती करत काही आश्वासने दिली होती. मात्र, ही आश्वासने पूर्ण न करता वन खात्याने दिशाभूल केल्याचा आरोप गुणेश गवस गवस यांनी यावेळी केला.

 

सुतळी बॉम्बचा वापर थांबवू अशी हमी दिल्यानंतरही आठ दिवसांतच पुन्हा बॉम्ब फोडण्यात आल्याचे सांगितले. तसेच ओंकारला नैसर्गिक अधिवासात हलवण्याची मागणीही प्रलंबितच राहिल्याची खंत व्यक्त केली. वन खात्याच्या चुकीच्या माहितीमुळे तसेच अपूर्ण आश्वासनांमुळे हा संघर्ष अपरिहार्य झाल्याचे गवस यांनी स्पष्ट केले. ओंकार बाबत वनविभागाची भूमिका संशयास्पद असल्याचेही त्यांनी सांगितले.

 

आंदोलनाला कोकणी रानमाणूस प्रसाद गावडे, साईप्रसाद कल्याणकर, रियाज खान, शैलेश लाड, राकेश केसरकर, राजन डेगवेकर, अभिजित सिनारी, पुरुषोत्तम दळवी, भरत गवस, राजेंद्र येडवे, चंद्रकांत सावंत, भूषण सावंत, ओंकार नाडकर्णी, सौरभ कविटकर, गौरेश सावंत, रंजन गवस, प्रवीण सातोस्कर, चंद्रकांत गावडे, भावेश देसाई, अनुप महाजन, चिंटू कुबडे आदींसह असंख्य नागरिकांनी पाठिंबा दर्शविला आहे.